Sunday, 25 July 2021

मनोवृत्ती

मनोवृत्ती

नुकतीच गुरुपौर्णिमा होऊन गेली. आपल्या सर्वांच्या स्फूर्तिदायी आणि आशीर्वचन देणार्‍या प्रतिक्रिया मला गुरूंप्रमाणेच मार्गदर्शक आहेत. विविध माध्यमातून पोहोचलेल्या प्रतिक्रियांचा विनम्रतेने स्वीकार करून, मी पुन्हा एकदा आपणा सर्वांना नमन करते. जनी जनार्दन या संतोक्तीचे  स्मरण करते. जनार्दन दाखवणा-या गुरुंना मनोभावे वंदन करते!

गुरुपौर्णिमेला ‘अनुभवाचं चांदणं’ पसरलं. आणि पुन्हा एकदा मी अनुभवला गुरुकृपेचा वर्षाव ! आशीष देणाऱ्या, सुखद वाटणाऱ्या, तृप्त करणार्‍या या वर्षावाने आपसूकच माझ्या वाटचालीवर ज्ञानाचा आल्हाददायक प्रकाश पसरला आहे. योगसूत्रांच्या विवेचनात माझ्याकडून ज्या गोष्टी सुटतात, ओघात राहून जातात, क्वचित विशिष्ट प्रवाहात वाहून जातात - त्यांचे प्रेमळ स्मरण गुरुंनी करून दिले आहे. या मार्गदर्शक  प्रकाशात योगसूत्र विवेचनाच्या या शब्दशक्तीला सुयोग्य, डोळस अर्थभक्ती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते.

 “योगशास्त्र विशाल आणि गहन आहे. त्याच्या अभ्यासात सातत्य राखावं, अभ्यासाची खोली वाढवावी. योगसूत्रांची वैश्विकता योगशास्त्राची तेजस्विता आहे. त्यांचा मूळ गाभा जपण्यासाठी साहित्य पुनरावलोकनाने सूत्रांचे विवेकपूर्ण विश्लेषण व्हावे. चिकित्सक निरूपण घडावे.” गुरुंनी या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. तेव्हा, ‘गुरुते वाट पुसतु वळुयात महर्षी पतंजलींच्या सहाव्या सूत्राकडे.

“प्रमाणविपर्ययविकल्पनिद्रास्मृतय:” ||६||

(पातंजल योगदर्शन, समाधिपाद, सूत्र क्र.६)

सूत्रार्थ – प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती या त्या पाच वृत्ती होत.

‘या त्या पाच वृत्ती होत’, म्हणजे काय हे समजावून घेताना पुन्हा एकदा थोडं,

पाचव्या सूत्राकडे वळावं लागेल. वृत्तयः पञ्चतय्यः क्लिष्टाSक्लिष्टा: ||  

या पाचव्या सूत्राचे विवेचन करताना ‘भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातंजल योगदर्शन’ या ग्रंथामध्ये ग्रंथकार ‘योगाचार्य कृष्णाजी केशव कोल्हटकर’ नोंदवतात, “....वृत्तीचे प्रकार आणि स्वरूप सांगण्याकरता हे सूत्र प्रवृत्त झाले आहे. या सूत्रात वृत्ती क्लिष्ट आणि अक्लिष्ट असल्याचे सांगितले आहे. आत्मसाक्षात्कार होईपर्यंतच्या वृत्ती क्लिष्ट म्हणजे क्लेशांनी युक्‍त असतात आणि आत्मसाक्षात्कार झालेल्या जीवनमुक्ताच्या ठिकाणी वृत्ती क्लेशरहित असल्यामुळे त्या अक्लिष्ट होत. अक्लिष्ट वृत्तींचा निरोध निष्प्रयोजन असून क्लिष्ट वृत्तींचा निरोध सप्रयोजन म्हणून अवश्य करणीय आहे, हे सूचित केले आहे. आता या पाच वृत्ती कोणत्या हे पुढील (म्हणजे सहाव्या) सूत्रात सांगितले आहे. सहाव्या सूत्राचा सूत्रार्थ ते देतात – ‘प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती या त्या पाच वृत्ती होत.’ म्हणजे त्यांच्या एकूण विवेचनानुसार, ‘आत्मसाक्षात्कार होईपर्यंतच्या वाटेवर या पाच वृत्ती क्लेशयुक्त ठरतात आणि त्यांचा निरोध जाणीवपूर्वक झाला पाहिजे.’

महर्षी पतंजलींची योगसूत्रे स्पष्ट करून सांगणाऱ्या स्वामी विवेकानंदांच्या ‘राजयोग’ या ग्रंथामध्ये सहाव्या सूत्राचा अर्थ व्यक्त करताना नोंदवलेलं आहे, या पाच वृत्ती पुढील प्रमाणे आहेत - सत्य ज्ञान (प्रमाण), भ्रम (विपर्यय), शब्दजन्य भ्रम (विकल्प), निद्रा आणि स्मृती. इथे वृत्तींसाठी वापरलेले पर्यायी शब्द आपल्याला परिचित वाटतात. त्यामुळे ते अर्थाच्या अधिक जवळ नेतात. योगसूत्राला नेमकं काय म्हणायचं आहे, ते उलगडायला लागतं. पुढील सूत्रांमध्ये एकेका वृत्तीचे स्पष्टीकरण येणारच आहे, तेव्हा त्याच्या तपशीलात त्यावेळी जाऊ.

या सूत्रावर भाष्य करताना, स्वामी माधवनाथ म्हणतात, मनात जेवढ्या वृत्ती उठतात त्यांची पाच प्रकारात वर्गवारी केलेली आहे. ते पाच प्रकार म्हणजे प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती. अक्लिष्ट किंवा अक्लेशकारक वृत्तींचा ध्यानात किंवा इतर जीवनातही अडथळा येत नाही. क्रोध, काम, अहंकार, मत्सर आदी क्लेशकारक वृत्ती आहेत. कामक्रोधादी वृत्ती निर्माण होणारच पण त्यांना संयमित ठेवता आलं पाहिजे. ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी या वृत्ती क्लेशमूलक नसतात. अज्ञान्याच्या ठिकाणी याच वृत्ती प्रमाणापेक्षा अधिक होऊन क्लेशकारक होतात.”

व्यावहारिक जीवनाचा विचार करताना आपण अज्ञानी माणूस म्हणण्यापेक्षा सामान्य माणूस म्हणूयात. सामान्य माणसाच्या ठिकाणी क्लेश, वेदना, दु:ख निर्माण होण्याची अनंत कारणे असतात. सौमित्र यांनी मात्र आपल्या गीतात या सगळ्या कारणांमागचे एक कारण चपखलपणे व्यक्त केलेले आहे.

‘माझिया मना जरा थांब ना.....तुझे धावणे अन् मला वेदना’

योगशास्त्र देखील हेच सांगते. म्हणून तर योगसूत्र सुरुवातीपासून चित्तवृत्तींचा निरोध सांगते, त्यांचे स्वैर धावणे बंद करायला सांगते. मनावरचे स्वामित्व म्हणजे योग. पातंजल सूत्रांवर भाष्य करताना ओशो सांगतात, “पतंजलींची सूत्र मनाची, त्याच्या वृत्तीची, त्याच्या नियंत्रणाची त्याच्या वापराची हळूहळू ओळख करून देतात. योगाच्या सर्व पद्धती, सर्व तंत्र, सर्व वाटा मनाला कसं वापरायचं या एकाच समस्येशी खोलवर निगडीत आहेत. योग्य रीतीने वापरलं तर मन अ-मन होतं. चुकीच्या पद्धतीने वापरलं तर मनात अराजकता, गोंधळ निर्माण होतो..... मनाच्या वृत्ती पाच आहेत त्या एक तर दुःखाचं मूळ कारण बनतात किंवा दुःखरहिततेचं कारण बनतात.”

सुख-दु:खावर प्रेम करत जगणारी आपण माणसं, दैनंदिन जीवनामध्ये दु:खरहिततेचा वगैरे विचारही करू शकत नाहीत. मनोवृत्तींच्या आवृत्ती काढत, हसत – खेळत – रडत – कुढत – नावं ठेवत – कौतुक करत – क्वचित कोणावर जळत आणि आयुष्याच्या एका टप्प्यावर कधीतरी उजळत आपला जीवनप्रवास चालू असतो. हे उजळणं जरा लवकर घडलं तर आयुष्य शांत – समृद्ध होतं, नाही तर गर्तेतच फिरत राहतं. प्रवाही व्ह्यायचं की भोव-यासारखं गरगरत राहायचं हे आपल्या वृत्तीच ठरवतात. संत तुकारामांचे सूत्र त्यासाठी लक्षात घ्यावे लागते.

        मन गुरू आणि शिष्य । करी आपुलें चि दास्य ।

        प्रसन्न आपआपणास । गति अथवा अधोगति ॥

क्लेश वाढवायचे की कमी करायचे, आपल्या हातात असते. हळूहळू का होईना क्लेश कमी होत जातील अशा पद्धतीने वृत्तींचा विकास करावा. नियोजन, स्वार्थरहितता, कार्यातील परिपूर्णता आपल्याला निष्कामतेकडे नेतात. मात्र आपल्या सकाम वृत्ती अपेक्षा आणि अपेक्षाभंगातून निर्माण होणा-या दु:खचक्रात आपल्याला  अडकवत राहतात.

आपण बऱ्याच वेळेला इतरांच्या प्रतिक्रियेवर अवलंबून राहतो आणि मनासारखी प्रतिक्रिया मिळाली नाही की दुःखी होतो. इतरांनी छान म्हणण्यात खरंच काय दडलेलं आहे?

छान - छान काय असतं?,  अपूर्णत्वाचं भान असतं

कामातली एकरूपता टाकून, बाहेर आलेलं ‘मी पण’ असतं

मी तदाकार झाला तर, सारं स्वत:लाच सुंदर दिसतं

तसं घडत नाही तेव्हा, शाश्वताशी तेवढं अंतर असतं .

हे अंतर जितके कमी करू तितके क्लेश कमी होतात.

वृंदा आशय


Sunday, 18 July 2021

केल्याने देशाटन

 

केल्याने देशाटन

योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन |

योSपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतंजलि प्रांजलिरानतोSस्मि ||

योगशास्त्राने मनाचा, व्याकरण शास्त्राने वाणीचा आणि वैद्यकशास्त्राने शरीराचा मळ नष्ट करणाऱ्या, महामुनी पतंजलींपुढे मी नतमस्तक आहे. इसवीसनपूर्व २०० हा महामुनी पतंजलींचा कालखंड मानला जातो. ‘योगसूत्र’, अष्टाध्यायीवरील ग्रंथ ‘महाभाष्य’ आणि ‘आयुर्वेदावरील भाष्य’ हे त्यांचे साधनारूपी लेखन-चिंतन म्हणजे भारतीय संस्कृतीला मिळालेली मोलाची देणगी आहे.

भारतीय दर्शनाच्या सहा दर्शनांमधील एक हे मुख्य स्थान योगसूत्रांना मिळालेले आहे. पतंजली मुनींचं हे जीवनचिंतन इसवीसनपूर्व काळापासून एकविसाव्या शतकापर्यंत प्रवाहीत होत आलेले आहे आणि पुढेही अखंड प्रवाहीत होत राहणार आहे. त्यांची ही योगसूत्रे आम्हाला आजही महत्त्वाची वाटतात, आजही त्यांच्या विवेचनाकडे आम्हाला जाणीवपूर्वक लक्ष द्यावे वाटते, याचा प्रत्यय तुम्हीच तर मला दिलात. जगभरात देशोदेशी विखुरलेले माझे भारतीय बांधव, माझे मराठी सुहृद ज्या पद्धतीने या ब्लॉगला वाचत आहेत, प्रतिसाद देत आहेत, तुमच्या या वाचनातून, प्रतिसादातून त्याचं प्रत्यंतर माझ्या मनापर्यंत गेलं. भारताव्यतिरिक्त ११ देशांमधून आपण याचे वाचन करत आहात. कालातीत असणाऱ्या आणि शाश्वत ठरलेल्या मार्गदर्शक महामुनी पतंजलींना, म्हणूनच माझ्या - तुमच्याकडून, आपल्या सर्वांकडून साष्टांग दंडवत !

वळूयात पाचव्या योगसूत्राकडे –

वृत्तयः पञ्चतय्यः क्लिष्टाSक्लिष्टा: ||५||  

(पातंजल योगदर्शन, समाधिपाद, सूत्र क्र.५)

वृत्तींचे प्रकार आणि स्वरूप या सूत्राद्वारे मांडले गेले आहेत. महामुनी सांगतात, वृत्ती असंख्य असल्या तरी पाच प्रकारात त्याचे वर्गीकरण करता येते. त्या पाच प्रकारांचे वर्गीकरण देखील ‘क्लिष्ट’ व ‘अक्लिष्ट’ म्हणजेच ‘क्लेशकारक’ आणि ‘अक्लेशकारक’ अशा दोन वर्गांमध्ये केलेले आहे.

क्लेश - दुःख हा शब्द उच्चारताच मला वाटायला लागलं, खरोखर दुःख हेच तर शाश्वत आहे. इथे दिवसभरातून किती वेळा मन मोडत असेल, मन खट्टू होत असेल, नाराज होत असेल त्याची गणतीच नाही. किती काय काय असतं मनामध्ये! मान मोडून काम केले तरी मनासारखं काही होईल तर, शपथ! आणि मग असं नाही झालं तर दुःख वाटणारचना. क्लेश वाटणारच. आमच्या साधुसंतांनी साहित्यिकांनी हेच तर सांगून ठेवलं आहे – ‘सुख पाहतां जवापाडें | दुःख पर्वताएवढें’ हे संत तुकारामांचे सांगणे असू द्या किंवा

‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे

जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे’

या सारखं ग.दि.माडगूळकरांचं अजरामर गीत असू द्या. ते आम्हाला आमच्या शाश्वत चिरंतन अशा दुःखाचीच जाणीव करून देतं ना.

इथे तर पतंजली मुनी सांगतात क्लेशकारक आहे ते सोडलं पाहिजे. आपण सोडतो पण काय सोडतो, ज्याचा त्रास शरीराला होतो ते सोडतो, आणि ज्याचा त्रास मनाला होतो ते मात्र धरतो. अर्थात शारीरिक कष्ट आम्ही सोडतो आणि मानसिक कष्ट वाढवतो. नकारात्मक गोष्टींमध्ये, दुःखामध्ये त्याच त्या आवर्तामध्ये आम्ही फिरत राहतो. मग आम्हाला आयुष्यच क्लेशकारक वाटायला लागतं.  जीवन जगण्याची कला अवगत करता आली पाहिजे. मला तर वाटतं ही कला माणसाजवळ उपजत असतेच. आपल्या सवयींनी, कामांनी पर्यायाने स्वभावामुळे आपण तिला हरवून बसतो.            

माणूस वयानं मोठा होत जातो तसतशी त्याची संवेदनशीलता कमी व्हायला  लागते. बालपण संपुष्टात यायला लागतं. तुम्ही म्हणताल वयासोबत प्रगल्भ व्हायचे नाही का? बालीशच राहायचं का? प्रगल्भ होणं म्हणजे असंवेदनशील होणं नव्हे. उलट कोणत्याही संवेदनशीलतेला अधिक जबाबदारीनं दिलेला प्रतिसाद म्हणजे प्रगल्भता. बालीशपण निराळं आणि स्वत:मधलं बालपण जोपासणं निराळं.

‘प्रौढत्वी निज शैशवास जपणे’ हा केशवसुतांनी व्यक्त केलेला बाणा आणि दिलेला संदेश सर्वपरिचित आहे. अहेतूकपणे, निरागसतेने प्रश्न विचारत हे बालमन आपल्या सभोवतीच्या जगाची ओळख करून घेत असतं. उत्स्फूर्तपणे व्यक्त होत स्वत:च्या प्रतिक्रिया नोंदवत जातं. मोठं व्हायला लागतो तसे प्रश्न हरवायला लागतात. मला वाटतं, प्रश्न हरवतात कारण आयुष्यासंबंधी, माणसांसंबंधी, नात्यांबाबत आपले अनेक ग्रह तयार होतात, आपण गृहीत धरायला लागतो. न जाणताच अनेक गोष्टींची उत्तरे मिळाल्यासारखे वागायला लागतो. आपण विचारलेल्या प्रश्नांमागेही विशिष्ट हेतू कार्यरत झालेले असतात. मग अहेतूकता, निरागसपण कसं राहणार? प्रश्न पडले पाहिजेत जिज्ञासेनं, त्यांचा पाठपुरावा करता आला पाहिजे सहजतेनं. आपलं बालपण जपता आलं पाहिजे ते उत्स्फूर्तता आणि उत्कटता सांभाळून ठेवत. उत्कटता आपल्याला आयुष्यभर साथ देते, जीवन रसरशीतपणे जगायला शिकवते.

क्लेश आणि क्लेशकारक अवस्था - व्यक्ती, कुटुंब, समाज, देश, मानवी समाज – जग, या पातळ्यांनुसार बदलत जाते. कुटुंबाच्या भल्यासाठी व्यक्तिहिताचा दुराग्रह आम्हाला सोडता आला पाहिजे, त्याला स्वार्थत्याग म्हणतात. समाजाच्या भल्यासाठी कुटुंबाला कष्ट पडले तरी, ते आम्हाला सोसता आले पाहिजेत त्याला चिकाटी म्हणतात. देशाच्या भल्यासाठी विशिष्ट समाजाच्या भलेपणाचा अट्टहास आम्ही सोडला पाहिजे त्याला सामंजस्य म्हणतात. मानवी समाजाच्या, जगाच्या कल्याणासाठी देशांना पुढाकार घेता आला पाहिजे, त्याला देशाचा स्वभाव – ‘राष्ट्रधर्म म्हणतात.

भारतीय संस्कृतीने, देशाला नव्हे जगाला दिलेली अनमोल देणगी म्हणजे ‘भारताचा अध्यात्मिक स्वभाव’ होय. भारताला मानवी कल्याणाची असलेली आत्मिक ओढ त्यातूनच निपजली आहे. भारत सांगतो माणसानं ‘धर्मानं’ वागावं म्हणजे क्लेशकारक काही घडत नाही. ही सृष्टी, हे ब्रह्मांड ज्या तत्त्वानं, ज्या नियमानं चालतं ती मूलभूत तत्त्वं म्हणजे धर्म. या नियमांशी नातं सांगत जीवनाची घडी बसवली की ते आपोआप धर्माधिष्ठित जीवन होते.

आपल्या संस्कृतीने प्रत्येक नात्याला, प्रत्येक भूमिकेला विशिष्ट धर्म दिलेला आहे. तो धर्म आम्ही यथास्थितपणं सांभाळला की क्लेशकारकतेला आमच्या जीवनात प्रवेश करण्याची अनुमती नाही. मात्र जेव्हा आम्ही आमचा धर्म सोडतो, तेव्हा आमची नाती शबल आणि दु:खदायी व्हायला लागतात. समाजातील अनेकविध घटना पाहता लक्षात येतं, आमची नाती कलुषित होत आहेत, शरमेनं मान खाली घालत आहेत. असं घडतं तेव्हा, आई-वडिलांचं आणि मुलांचं, भावा-बहिणीचं, पती-पत्नीचं, नणंद-भावजयीचं, सासू-सूनेचं नातं संशयाचे प्रश्न आणि अविश्वासाचं वातावरण निर्माण करायला लागतं. कुटुंबव्यवस्था हा भारतीय समाजाचा पाया आहे. जे जे क्लेशकारक आहे ते सगळं सोडून हा पाया भक्कम करावाच लागेल.

समर्थ भारत फक्त इतिहासामध्ये नसतो. केवळ तो गौरव आठवून फुकाचा अभिमान आम्ही बाळगायचा नसतो. हा भारत अखंड आणि सामर्थ्यशाली राहील यासाठी जाणीवपूर्वक आम्ही आमचे योगदान, वर्तमानाच्या गरजांनुसार, कालभान राखून, प्रसंगानुरूप द्यायचं असतं. ते देता आलं पाहिजे. त्यातूनच घडत असतं, तावून सुलाखून निघालेलं प्रत्येकाचं भारतीयत्व !

विश्वभर संचार करणाऱ्या या भारतीयत्वाच्या चेतनेचा मला अभिमान आहे. दिक्कालावर मात करत आपल्या कर्तृत्वाच्या प्रतिभेने जगभर संचार करा, पण भारतीयत्वाच्या सत्त्वाचा विसर पडू देऊ नका. जीवनमूल्यं हरवली की समूळ नाश व्हायला लागतो. तेव्हा संस्कृतीचं सार घेऊन आपण पाय रोवून उभे राहा. संत तुकारामांच्या आत्मविश्वासानं सांगा,

“आम्ही भारतवासी | आलो याचि कारणासी |

 बोलिले जे ऋषी | साच भावे वर्ताया ||"

जगभरातल्या स्वार्थी सत्तांना ठणकावून सांगा, अन्यायकारी वृत्तींना दम देऊन सांगा, शोषक प्रवृत्तींना धारेवर धरून सांगा; संत ज्ञानदेवांचे पसायदान ‘विश्वगीत’ करणारे आम्हीच आहोत. शांती प्रस्थापित करण्यासाठी सामर्थ्य व्यक्त करता आलं पाहिजे. मानवी कल्याणाचे अग्रदूत म्हणून समर्थपणे जबाबदारी सांभाळता आली पाहिजे.

वृंदा आशय 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Sunday, 11 July 2021

ये हृदयीचे ते हृदयी !

 

ये हृदयीचे ते हृदयी !

आषाढ मास सुरु झाला. सृष्टीचं नंदनवन फुललं. मनाला भक्ती-भावाचं चंदन लागलं. या प्रसन्न, सुगंधी परिसरातून महाकवी कालिदासांना वंदन. सृष्टीला कवेत घेत, भारतीय संस्कृतीतला चिरंतन प्रेमाचा वारसा जगापर्यंत पोचवणा-या, कालातीत साहित्यकृतींचं मनोभावे स्मरण! वृत्ती-प्रवृत्तींना प्रफुल्लित करणा-या या सुंदर वातावरणात वळूयात महर्षी पतंजलींच्या चौथ्या सूत्राकडे -
     

‘वृत्तिसारूप्यमितरत्र’ (पातंजल योगदर्शन, समाधिपाद, सूत्र क्र.४)

सूत्रार्थ -   निरोधाव्यतिरिक्त इतर अवस्थांमध्ये तो द्रष्टा चित्तातील वृत्तीशी सरूपता पावल्यासारखा असतो. द्रष्टा चित्तवृत्तीशी एकरूप झाल्यासारखा / तद्रूप झाल्यासारखा भासतो.

सूत्र क्र. ३ आणि ४ मधून महर्षी चित्ताचे लक्षण सांगतात. ज्याचा निरोध झाला असता द्रष्टा आपल्या स्वरूपाने अवस्थित असतो आणि ज्यात वृत्ती उत्पन्न झाल्या  असता द्रष्टा त्या त्या वृत्तीशी जणू  सरूपता पावतो ते चित्त. वास्तविक पाहता दोन्ही अवस्थांमध्ये द्रष्टा किंवा आत्मा निर्विकार असतो. मात्र चित्ताच्या विकारांमुळे तो वृत्तींशी तद्रूप झाल्यासारखा भासतो. वृत्तीशी तद्रूप झाला की त्याला स्वरूपाचे नाही तर वृत्तीचेच भान राहते. आपण वृत्तीबरोबर वाहत जातो. साक्षित्व सोडून इतर सर्व अवस्थांमध्ये आपलं मनाशी तादात्म्य असतं. विचारांच्या आधारे आपण वृत्तीशी एकरूप होतो. मुळात चित्त हे नेहमीच आपल्या शुद्ध स्वरुपाकडे जाण्याचा प्रयत्न करते. पण इंद्रिये त्याला बाहेर खेचत असतात. चित्ताचा संयम करून त्याच्या बहिर्मुख प्रवृत्तीला आळा घालणे, आत्म्याच्या दिशेने त्याला अंतर्मुख करणे, हीच योगाची पहिली पायरी आहे. चित्त फक्त माणसांमध्येच बुद्धीच्या रूपाने विकसित होते. त्यामुळेच वानराचा नर आणि नराचा नारायण ही उन्नत्ती शक्य होते.

दैनंदिन जीवनामध्ये वृत्तींचा विचार करताना, वृत्त, वृत्ती आणि वृत्ताकार हे तीन शब्द परस्परांच्या फार जवळचे वाटतात. कोणतंही वृत्त (बातमी) कळालं, मग ते मानसिक, वैचारिक, शाब्दिक, किंवा कृतीच्या पातळीवरचे असो. वृत्त कळताच वृत्ती निर्माण होतात आणि वृत्ताकार फिरत राहतात. पुन: पुन: तेच ते, तेच ते. घटना घडून गेली तरी स्मृतिरंजनाच्या माध्यमातून आपण ती घटना पुन: पुन: घडवत राहतो. जागेपणीच्या या छंदामुळे स्वप्नातही ती आपसूक घडते.

एखाद्यामध्ये रागाची वृत्ती पुन: पुन: निर्माण झाली की आपण म्हणतो, माणूस रागीट आहे. प्रेमाची वृत्ती पुन: पुन: निर्माण झाली की म्हणतो, माणूस प्रेमळ आहे. कोणी सतत आकडूपणाने वागला की आपण म्हणतो माणूस खडूस आहे. आपण माणसाला / स्वतःला वृत्ती समजतो. मात्र वृत्ती व आपण वेगळे असतो. आपण वृत्ती नव्हे तर  वृत्तीचे चालक असतो. स्वत:लाच वृत्ती समजल्याने, चलित समजल्याने वृत्तींच्या भडीमाराने, गदारोळाने आपण विचलित होतो. अंत:रंगाला रणभूमी करण्यास आम्हीच कारणीभूत असतो. मग आमच्यातला गर्भगळीत अर्जुन बाहेर कृष्णाचा शोध घेत राहतो. वृत्तीचे चालकपण थांबवून आपण द्रष्ट्याची भूमिका घेतली, की ज्ञान प्राप्त होऊ लागते. द्रष्टा स्थित व्हायला लागतो.

द्रष्टा स्थित व्हायला लागला म्हणजे स्वत:ची ओळख पटायला लागते. समाजात स्वत:ची ओळख निर्माण करण्याचे सामर्थ्यही येते. अन्यथा इतरांसारखं करण्याच्या प्रयत्नात आयुष्य दडपणाखाली येते, प्रवाहपतित होण्याचीही शक्यता असते. द्रष्टा स्थित व्हायला लागला की आपल्याला वेगळं काही करावं लागत नाही. फूल फुललंय हे त्याची गंधवार्ताच वा-यावर पसरवते. त्यासाठी प्रत्येक वर्तमान क्षण समरसून जगता आला पाहिजे. खळखळून हसावं, हमसून हमसून रडावं, कडकडून भांडावं. जीवनाची मजा आहे त्यात. उगा काय कुढत बसायचं? संवेदनशीलतेने जगणं महत्त्वाचं. वरवरचं जगणं, आभासी जगणं टाळता आलं पाहिजे. ‘मोले घातले रडाया, नाही आसू नाही माया’ अशी अवस्था काय कामाची? 

नैसर्गिकतेनं जगताना काटा टोचल्याचं दु:ख नसतं. पण फूल बोचायला लागलं की साशंकता वाढते. आपल्या मनामध्ये नकारात्मकता, द्वेष, सूड यासारख्या भावना निर्माण व्हायला लागतात. तिथल्या तिथे न संपता त्या कॅरी फॉरवर्ड होतात. त्यामुळे भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचा निर्णय घेऊ नये. विचार करावा आणि मनाची इम्युनिटी पॉवर वाढवावी. विचार एक शक्ती आहे. तिचा सुयोग्य वापर करता यावा. विचारांच्याच पातळीवर प्रतिक्रियेऐवजी प्रतिसाद देण्यास लागलो तर कृती अधिक निश्चयी आणि सकस होतील. रिअॅक्शनच्या ऐवजी रिसपॉन्स देण्याची स्वत:ला सवय लावली की आपल्यातला वर्तमान क्षणात जगणारा रिसपॉन्सिबल माणूस घडायला लागतो. भूतकाळातल्या क्षणांची बातमी होते आणि भविष्यकाळातले क्षण वेधमय असतात. बातमीत गुंतू नये आणि वेधात अडकू नये.

ऑनलाइन प्रणालीद्वारे आभासी जगात वावरत असताना एक पालुपद आपण अनेकवेळा ऐकतो - यू आर नॉट कनेक्टेड. त्याबरोबर जाणीव होते अडथळा निर्माण झाल्याची. बहिरंगाकडून अंतरंगाकडच्या प्रवासात ‘स्टे कनेक्टेड विथ युवरसेल्फ’ हे खूप महत्त्वाचे आहे. तो श्रीरंग रंग खेळतोना तसा. रंग खेळताना तो नखशिखान्त भिजतो. मात्र रंगातून बाहेर आल्यावर एक शिंतोडाही त्याच्या अंगावर दिसत नाही. तसं युक्त होऊन मुक्त व्हावं. जीवनाचा सुंदर अनुभव घ्यावा.

बहुतांश वेळा आमचे विचार पूर्वानुभवावरच नव्हे तर पूर्वग्रहावर आधारित असतात. नव्या अनुभवाला मोकळ्या मनाने आम्ही सामोरे जाऊ शकत नाही. खुल्या मनाने (ओपन माईंड) जगता आले पाहिजे. खुल्या मनाने एकरूप झालो तर घटनांची वस्तुनिष्ठ, अचूक, नेमकी माहिती आपण घेऊ शकतो. त्याआधारे तर्कशुद्ध विचारसरणी विकसित करू शकतो. या एकरूपतेशिवाय साहित्यातून, संगीतातून, नृत्यातून समाधीचा आनंद कसा मिळणार? कला, संशोधन, विज्ञान सारं शेवटी आनंदाकडेच वळतं.  एकरूपतेतूनच सौंदर्याचा प्रत्यय येतो. सत्याचा स्वीकार, शिवत्वाची/ मांगल्याची कामना करत झाला की सौंदर्य फुलतं. विचारांच्या शक्तीने असं सौंदर्य समाजमनामध्ये निर्माण झाले की, ‘ये हृदयीचे ते ह्रदयी’ व्हायला वेळ लागत नाही. विश्वमनाची मशागत झाली की सृजनाचा,समृद्धतेचा, सत्य-शिव-सुंदराचा प्रत्यय येणारच. संत ज्ञानदेवांचं पसायदान प्रत्यक्षात उतरणारच. त्यासाठी प्रत्येकाने एकच करायला हवं - स्टे कनेक्टेड. स्टे सेफ.

वृंदा आशय

 















Sunday, 4 July 2021

प्रकाशते अंतर; देवकृपा निरंतर ….. !

प्रकाशते अंतर; देवकृपा निरंतर ….. !

वाणीची देवता देवी सरस्वतीला नमन ! या वाणीची प्रेमाने, कौतुकाने, मार्गदर्शनाने जोपासना करणा-या, तिच्या संवर्धनाला वाव देणा-या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेला, माझ्या शाळा - महाविद्यालयाला मानाचं वंदन! मला घडवणा-या सर्व गुरुजनांची आणि आजही जीवंत ठेवणा-या माझ्या विद्यार्थ्यांची मी कृतज्ञ आहे. शब्दांवर प्रेम करणाऱ्या आणि वाणीचाही स्वीकार करणाऱ्या वाचक, श्रोत्यांना अभिवादन! तन-मन पुलकित करणाऱ्या आपल्या प्रतिक्रिया घडवतात सहज-चिंतन! चला वळूयात, महर्षी पतंजलींच्या तिसऱ्या सूत्राकडे –

तदा द्रष्टु: स्वरूपेऽवस्थानम् ! (पातंजल योगदर्शन, समाधिपाद, सूत्र क्र.३.)

[अर्थ - तेव्हा द्रष्टा आपल्या (शुद्ध) स्वरूपात स्थित होतो.]

तेव्हा म्हणजे केव्हा? द्रष्टा म्हणजे कोण? स्वरूप म्हणजे काय? अनेक प्रश्न. सगळ्या प्रश्नांचं उत्तर देणारं योगशास्त्र, मोठं स्वच्छ, स्पष्ट आणि पारदर्शक आहे. १९५ सूत्रांचा हा प्रवास, अवघ्या चराचराला - लौकिक आणि पारलौकिकाला कवेत घेणारा, व्यापक आणि सखोल असा आहे. या प्रवासात कोणीही गडबडून जाऊ नये, चक्रावून जाऊ नये यासाठी सुरुवातीलाच दिशा स्पष्ट केलेली आहे. हा प्रवास कुठून सुरू करायचा आणि आपण कुठे पोहोचणार, याची स्पष्ट कल्पना महर्षी प्रारंभीच देतात. पहिल्या सूत्रात अनुशासनाचा मार्ग सांगितला. दुसऱ्या सूत्रात चित्तवृत्तींच्या निरोधापासून सुरुवात करायला सांगितली. आणि तिसऱ्या सूत्रात या प्रवासाच्या शेवटी आपण कुठे पोहोचणार, ते मुक्कामाचं ठिकाण सांगितलं.

हा प्रवास कोणासाठी किती काळाचा असेल? कोणाला सोयीचा वाटेल, कोणाला गैरसोयीचा वाटेल? कोणासाठी सहज आनंदाचा ठरेल तर कोणाला खडतर भासेल, हे ज्याचं त्याच्यावर अवलंबून. एकदा प्रवासाला लागलं की मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचणारच, हे मात्र निर्विवाद सत्य. माणसाचं खरं स्वरूप असतं मनाच्या पलीकडे. चित्तवृत्तींचा निरोध करून मनाला अ-मन करता आलं की, या प्रवेशाचं दार उघडतं. चित्ताच्या पाच प्रकारच्या अवस्था सांगितल्या जातात. ‘मूढ’ अवस्थेत दाट अंधारल्यासारखीच स्थिती होते. ‘क्षिप्त’ अवस्थेत मन विखुरलेले असते. ‘विक्षिप्त’ अवस्थेत मन स्वतःच्या केंद्राकडे जाण्याचा प्रयत्न करते. ‘एकाग्र’ अवस्थेत मनात अंतर्मुख होण्याचे सामर्थ्य येते. ‘निरुद्ध’ अवस्थेत चित्तवृत्तींचा निरोध होतो. ही अवस्था समाधीच्या दिशेने घेऊन जाते.

वृत्ती म्हणजे मनावर उठणारे तरंग. हे तरंग जसे उठतात तसेच विरू दिले की मन शांत होतं. एखाद्या शांत डोहाचा तळ स्पष्टपणे दिसावा, तसं ‘स्व-रूप’ कळायला लागतं. मानवी मन मात्र या तरंगांमध्ये तरंगत राहतं. मनसोक्त डुंबतं. खोलवर डुंबणार्‍याला, बाहेर काढायला वेळ लागेलच ना.

त्यासाठी सुरुवात करावी लागते, Learn to say no या मॅनेजमेंटच्या तत्त्वाने. सेल्फ मॅनेजमेंट केल्याशिवाय स्वरूपात स्थिर कसं होणार? स्वत:च्या उत्कृष्ट व्यवस्थापनासाठी, ‘काय हवं - काय नको’ ते ठरवावं लागतं. जे हवं ते जाणीवपूर्वक वाढवावं लागतं, जे नको ते काढावं आणि फेकावे लागतं. मौज अशी की अ-मनाच्या दिशेने जायचं आहे, मात्र काय हवं-काय नको, ते मन सांगायला लागतं. लुडबूड करत मोठ्या हिकमतीने या डोहात आपल्याला ‘आनंदाने बुड’ असं सांगतं. मग बुद्धीला आपली छडी काढावी लागते. सुरु होतो संघर्ष श्रेयस आणि प्रेयसाचा.

पाच- पाच खिडक्या उघडून पळणारं मन सहज थोडीच हाती येणार? ते दंगा करत राहातं. आरडाओरडा करतं. नजर पडली की मन म्हणतं, ‘दिसलं दिसलं’. बुद्धीची छडी सांगते, ‘मी दाखवेल ते पाहा’. कानावर काही पडलं, की मन म्हणतं, ‘कानावर आलं, ऐकू आलं’. बुद्धी कान धरुन सांगते, ‘ऐकायला शिक’. कानावर पडणं निराळं, ऐकणं वेगळं. चाखणं निराळं, चव घेणं वेगळं. हात लागणं निराळं, स्पर्श करणं वेगळं. वास येणं निराळं, गंधित होणं वेगळं. दिसणं निराळं, पाहाणं वेगळं. पाहण्यातून घडते दृष्टी आणि दृष्टीतून विकसित होतो दृष्टिकोण. दृष्टिकोण स्वत:ला घडवायला, स्थिरावयाला, स्वत:चे व्यवस्थापन करायला कारणीभूत ठरतो.

विकसित दृष्टी शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या तत्त्वांचा परिचय करून घ्यायला मदत करते. जसजसं स्थिर होत जातो, तसतसं कळायला लागतं या तत्त्वांनी तर अवघी सृष्टी घडली आहे. आत आणि बाहेर तेच. जे व्यष्टीत ते समष्टीत आणि तेच सृष्टीत. मग भेद कशाचा? भांडण कशाचं? संघर्ष कशासाठी?

‘आनंदाचे डोही, आनंद तरंग’ अशी अवस्था होऊन देही उभा असलेला पांडुरंग दिसला की कळतं, ज्याच्या शोधात मी भरकटतोय, तो तर प्रत्येक क्षणी सोबतच होता. मार्ग दाखवत होता, काटे वेचत होता. वेळ पडली की उचलून कडेवरही घेत होता. फक्त स्वतःलाच नव्हती त्याची जाणीव. ..... ‘अंतर प्रकाशते’ आणि निरंतर वाहणाऱ्या देवकृपेपुढे नतमस्तक होते. ‘तो’ मोठ्या मनाचा. गळाभेट घेतो. आपण एकरूप होतो. पारलौकिकाचा हा आनंद मिळायला कदाचित वेळ लागेल.

‘प्रत्यक्षाहूनी प्रतिमा उत्कट’ या वृत्तीतून अलौकिकाचा वेध लागतो. मात्र ‘प्रतिमेहूनही प्रत्यक्ष निकट’ हे देखील जाणीवपूर्वक लक्षात घेतले पाहिजे. तेव्हा हे लौकिक जग सुंदर करायला, कोणी थांबवलंय का आपल्याला? ‘तो’ जर सोबतच असतो तर उचलावीत पावलं, बिनधास्तपणं, आत्मविश्वासानं, संपूर्ण जबाबदारीनं. स्वरूपाला विश्वरूप व्हायला वेळ लागणार नाही. बिंब-प्रतिबिंब अशा या खेळात निखळ आनंद आहे. तो निर्मळ मार्गानंच प्रत्ययाला येतो. चला, निर्मळ होऊ या, सामूहिक शक्तीने जग सुंदर करूया!

वृंदा आशय


पुनश्च हरि ॐ !

  (दि.२१ जून २०२२ रोजी योगाभ्यास करताना सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यांसमवेत संपूर्ण प्राध्यापक वर्ग    ) .   पुनश...