Monday, 4 October 2021

प्रत्यय कृष्णसुखाचा !

 



                                             कवी - अनामिक

प्रत्यय कृष्णसुखाचा !


         पहाटेचे साडेचार वाजले की, अंगणाची ओढ लागते. त्या ओढीकडे दुर्लक्ष करून, समोरच्या पुस्तकात लक्ष घालून कितीही वाचू म्हणलं, तरी लक्ष लागत नाही. प्रयत्न केला तरी ते  शक्य होत नाही. तो मन खेचून घेऊन जातो, मग पावलं वळायला कितीसा वेळ लागणार ?

     दार उघडून अंगणात गेले. पावसाळी वातावरण. सारी सृष्टी सांद्र झालेली. फांद्या, पानं, फुलं जागच्याजागी डोलून स्वतःचा आनंद व्यक्त करत होती. सृष्टीत भरून राहिलेल्या कृष्णाला पाहून आनंदित होणारी ही फुलं-पानं मोठी मनमोहक दिसत होती. नुकतंच दीर्घश्वसन झालेलं होतं. त्यामुळे पारिजातकाचा सुगंध खोलवर गेला. कृष्ण–रुक्मिणी-सत्यभामा सगळ्यांची त्या सुगंधानं आठवण करून दिली. इतक्यात चांदीपाटाचं फूल आपसूक गळून पडलं. झाडावरचं फूल पडताना निवांतपणं पाहण्यात, काय सौंदर्य साठवलेलं आहे, याचा प्रत्यय घेतला. या सगळ्या सृष्टीत भावोत्कट झालेली मी कृष्णचरणी समर्पित झाले आणि नंतर क्षणात तटस्थता अनुभवली. अनुभवाच्या या दोन टोकांनी, मी चकित झाले. पण त्याचं काम त्यानं केलेलं होतं. कृष्णार्पणमस्तु!

     वळूयात महामुनी पतंजलीच्या पंधराव्या सूत्राकडे. सूत्र आहे वैराग्याचे. वैराग्य हे वृत्तीत असते. देवाने जे दिले त्यात समाधान मानून इतर काही मिळण्याची इच्छा न होणे, म्हणजे वैराग्य होय. श्रीमद्भगवद्गीता (६.३५) आणि  योगसूत्रे  यांमध्ये (१.१२) चित्ताच्या सतत उत्पन्न होणाऱ्या वृत्तींना निरुद्ध करण्याचे दोन उपाय सांगितले आहेत – अभ्यास आणि वैराग्य. ज्याप्रमाणे नदीला बांध घालून तिचे पाणी योग्य दिशेला वळविता येऊ शकते, त्याचप्रमाणे अनर्थकारी विषयांकडे जाणाऱ्या चित्ताला वैराग्याद्वारे नियंत्रित केले जाते व अभ्यासाद्वारे योग्य मार्गाकडे नेले जाते. ज्ञानसहित वैराग्य हेच कैवल्य उत्पन्न करते हा गर्भितार्थ स्पष्ट करणारे १५ वे सूत्र पुढीलप्रमाणे -

 

दृष्टानुश्रविकविषयवितृष्णस्य वशीकारसंज्ञा वैराग्यम् || १५||

( पातंजल योग, समाधिपाद, सूत्र क्रमांक १५ )

याचा सूत्रार्थ सांगताना योगाचार्य कोल्हटकर सांगतात, “ज्यांचा प्रत्यक्ष अनुभव घडला ते दृष्ट विषय आणि शास्त्रादिकांवरून जे समजले ते आनुश्रविक विषय होत. या दोनही प्रकारच्या विषयांविषयीं जी तृष्णा म्हणजे आसक्ती ती ज्याच्या चित्तातून नाहीशी झाली आहे अशा वितृष्ण पुरुषाचें विषयाविषयी जे वैतृष्ण्य म्हणजे वैराग्य ते वशीकारसंज्ञक  वैराग्य होय.”

या विषयात दृष्ट विषय आणि आनुश्रविक विषय असे दोन प्रकार आहेत. (दृष्ट आणि दुष्ट हे दोन शब्द पूर्णत: निराळे आहेत, हे आवर्जून नमूद करावेसे वाटते.) दृष्ट म्हणजे इंद्रियांच्या द्वारा ज्यांचा अनुभव आपल्याला प्रत्यक्ष येथे घेता येतो आहे, असे शब्द, स्पर्श, इत्यादी भोग्य पदार्थ. आनुश्रविक म्हणजे शास्त्र, परंपरा, आप्त यासारख्या विश्वासार्ह व्यक्ती, इत्यादिकांकडून ऐकून माहीत झालेले स्वर्ग, अमृतयासारखे विषय. सामान्य माणसांच्या अंत:करणात या दोनही प्रकारच्या विषयांसंबंधी 'हे विषय उपभोगार्थ मला मिळावेत’ अशा प्रकारची तृष्णा असते.

मराठी विश्वकोशामध्ये याचा संदर्भ मोठा छान स्पष्ट केलेला आहे. त्यातील नोंदीत,  समीक्षक : कला आचार्य’ लिहितात,  योगसूत्रांमध्ये (१.१५, १.१६) दोन प्रकारच्या वैराग्याचे वर्णन केले आहे – अपरवैराग्य आणि परवैराग्य. अपरवैराग्य म्हणजे योगसाधनेच्या प्रारंभिक स्थितीमध्ये असणारे वैराग्य होय. दृष्ट म्हणजे लौकिक जगतातील अन्नपान, स्त्रीसुख इत्यादी भौतिक विषयांप्रती आणि आनुश्रविक म्हणजे अलौकिक जगतातील स्वर्ग, अप्सरा  इत्यादी दिव्य विषयांप्रती असणारी आसक्ती नष्ट होणे म्हणजे अपरवैराग्य होय.

वाचस्पती मिश्र आणि विज्ञानभिक्षु या व्याख्याकारांनी अपरवैराग्याच्या चार अवस्था वर्णिलेल्या आहेत – यतमान, व्यतिरेक, एकेन्द्रिय आणि वशीकार. योगी क्रमाने या चार अवस्थांना पार करतो.

(१) यतमान : सामान्यत: राग, लोभ इत्यादी चित्तातील विकारांमुळे इंद्रिये नेहमी विविध विषयांकडे आकृष्ट होत असतात. ती आकृष्ट होऊ नये या दृष्टीने केला जाणाऱ्या प्रयत्नांचा आरंभ म्हणजे यतमान अवस्था होय. या अवस्थेमध्ये संपूर्ण वैराग्य साध्य होत नाही, परंतु वैराग्यभावना उत्पन्न होण्याच्या दृष्टीने योग्याची वाटचाल सुरू होते.

 

(२) व्यतिरेक : विषयांप्रती असणारी आसक्ती नष्ट होण्याच्या उद्देशाने सतत प्रयत्न केल्यावर काही वस्तू अथवा विषयांच्या बाबतीतील राग, लोभ इत्यादी दोष नष्ट होतात; परंतु अन्य काही वस्तूंप्रती योग्याच्या मनात राग, लोभ अजूनही शिल्लक असतो. कोणत्या विषयासंबंधी दोष नष्ट झाले आहेत व कोणत्या विषयासंबंधी अजून शिल्लक आहेत, याचे तटस्थ भावनेने परीक्षण करणे ही वैराग्याची व्यतिरेक अवस्था होय.

 

(३) एकेन्द्रिय : बाह्य इंद्रियांवर संपूर्ण नियंत्रण प्राप्त झाल्यावर ती इंद्रिये शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या विषयांप्रती आसक्त होत नाहीत. परंतु, पूर्वकाळातील अनुभवांमुळे चित्तामध्ये सुप्त रूपाने राहिलेले ते रागादि दोष अजूनही संस्कार रूपाने विद्यमान असतात व पुन्हा जागृत होण्यासाठी उत्सुक असतात. मनाद्वारे त्या सुप्त संस्कारांचे व्यवस्थापन करणे व पुन्हा त्यांना जागृत होऊ न देणे ही वैराग्याची अवस्था म्हणजे एकेन्द्रिय होय. मनरूपी एकाच इंद्रियाद्वारे रागदोषावर नियंत्रण केल्यामुळे या अवस्थेला ‘एकेन्द्रिय’ अशी संज्ञा आहे.

 

(४) वशीकार : ज्यावेळेस बाह्य इंद्रियेही विषयांपासून विरक्त होतात, चित्तातील सुप्त संस्कारही जागृत होऊ इच्छित नाहीत आणि योग्याचे चित्त पूर्णपणे वैराग्यभावनेने युक्त असून त्याच्या नियंत्रणातही असते, त्या अवस्थेला वशीकारनामक वैराग्य असे म्हटले जाते.

वरील चार अवस्थांमध्ये ‘वशीकारसंज्ञक वैराग्य’ हेच सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे पतंजली ऋषींनी सूत्रामध्ये फक्त वशीकार वैराग्याचाच नामोल्लेख केलेला आहे. कारण अन्य तीन प्राथमिक अवस्थाही त्यात गृहीतच आहेत.जीवनात तीव्र दु:खाचा अनुभव आल्यावर व्यक्तीच्या मनात काही काळापुरते वैराग्य उत्पन्न होते, परंतु ते तात्कालिक आणि नैमित्तिक असल्यामुळे योगसाधनेमध्ये त्याला महत्त्व नाही. चित्तामध्ये वैराग्याची भावना दृढ झाल्यावरच सर्वश्रेष्ठ ज्ञान प्राप्त होते व चित्तवृत्ती निरोधाद्वारे कैवल्य अवस्था प्राप्त होते, असे योगदर्शन मानते.

योगाभ्यासास प्रवृत्त झालेला विवेकी मनुष्य अशा विषयांविषयी वितृष्ण झालेला असतो. विवेकाच्या तारतम्याने वैराग्याच्या स्वरूपात आरंभीच्या प्रयत्नापासून तो वैतृष्ण्यरुपी अंतिम सीमा गाठली जाईपर्यंत या उत्तरोत्तर श्रेष्ठ अवस्था प्राप्त होत असतात. त्या चार असून त्यातील सर्वात श्रेष्ठ अशी अवस्था म्हणजे वरील ‘वशीकारसंज्ञक वैराग्य’ होय.

वैराग्य हे वृत्तीतच असते, हे स्पष्ट करणारी एक कथा अगदी थोडक्यात पाहूयात. एक आश्रम होता. गुरूंची गादी चालवण्यासाठी योग्य शिष्याची निवड त्याठिकाणी करायची होती. गुरुजींनी सगळ्या शिष्यांना आधीच सांगितलेलं होतं, “ नियमांचे पालन काटेकोरपणे करणा-यालाच गादीचा वारस होता येईल.”  नियमांचे शक्य तेवढे कडक पालन करत, आता कोणाला हा वारसा मिळणार याची उत्सुकता प्रत्येकाच्याच मनात होती.

 एकदा हे सगळे शिष्य दूरवरच्या नदीकाठी फिरायला म्हणून गेले. नदी ओलांडताना एका स्त्रीनं त्यांची मदत मागितली. तिलाही नदी ओलांडून जायचं होतं. तिला पलीकडे नेणार कसं?, हा प्रश्न होताच. शेवटी त्या एका शिष्याने त्या स्त्रीला आपल्या पाठीवरती घेतलं आणि नदी पार करून दिली. बाकी शिष्य मनातल्या मनामध्ये आनंदित झाले, की वारसा हक्काच्या गादीतून हा वगळला गेला.

चार दिवसांनी गुरुजींनी सर्वांना बोलावलं. गादीचा वारस नेमला गेला. पाठीवरती महिलेला घेऊन नदी ओलांडणाऱ्या शिष्याचीच वारस म्हणून नेमणूक झाली. सगळेच आश्चर्यचकित झाले. सरतेशेवटी गुरुजींना प्रश्न विचारला, “तुम्ही या शिष्याची निवड कशी काय केली? आपल्याकडे स्त्रीचा स्पर्श, स्त्रीचे चिंतन वर्ज्य  मानले जाते. यांनी तर परवा एका महिलेला पाठीवरती घेऊन नदी ओलांडून दिली.” गुरुजींनी स्मित केलं आणि ते एवढेच म्हणाले, “त्याने त्या महिलेला नदीपल्याड सोडून दिलं, तेव्हाच सोडून दिलं; पण तुम्ही मात्र तिला इथपर्यंत घेऊन आलात आणि गेल्या चार दिवसांपासून तुमच्या मनामध्ये तिला वागवत आहात.”

वैराग्य म्हणजे जबाबदारी टाळणे नव्हे तर कर्माची जाणीव न होता पूर्ण कर्म करणे. वैराग्यामध्ये सामर्थ्य अपेक्षित आहे. हा देश  संन्याशांनी चालवलेला आहे. ऋषी-मुनींनी जंगलामध्ये तप करून संसार कसा असावा, याची सूत्रं आखून दिलेली आहेत. जिथे कमी तिथे आम्ही या  भूमिकेतून वैराग्याने नि:संग कर्तव्यपूर्ती केलीच पाहिजे.
     वैराग्य  वैर आणि प्रेम यांच्या पलीकडे जाणारे असते.कोणाशीही नीतीने वागू शकणारा तो विरागी असतो.राग म्हणजे आसक्ती तर वैराग्य म्हणजे आसक्तीचा अभाव. वैराग्य भावरूप (अस्तित्वरूप) नाही तर अभावरूप आहे. 

श्रीकृष्णांनी सांगितलं, उपभोगून पलीकडे गेल्यावर येणारं वैराग्य असंच सृष्टीसारखं ओलं, स्निग्ध, सांद्र असतं. त्यात रुक्षता, कोरडेपणा, रखरखीतपणा येत नाही. उपभोगताना तन्मय होऊन उपभोगावे आणि उपभोगून झाल्यावर क्षणभरही तिथे अडकू नये. नि:संग, निरामय होऊन पुढे चालावं. हातावेगळं केलं की मनावेगळं करावं,वैराग्य  यापेक्षा निराळं ते काय असणार? अनुरागात, रागात आणि वैराग्यात सर्वत्र कृष्णच आहे.त्याला शरण गेले की कृष्णसुखाचा प्रत्यय येतो.

हे सर्वव्यापी श्रीकृष्णा, तुझ्या चरणी पूर्णपणे समर्पित होऊन, तुझे नाम धारण करण्याची अनुमती दे, हीच प्रार्थना! 

कृष्णसखी,

वृंदा आशय

 

  

5 comments:

  1. नाथांनी वाळवंटातून उचललेले मूल कडेवर घेतले असे सूत्राचे विवेचन वाचल्यावर वाटले

    ReplyDelete
  2. छान विवेचन 🙏🙏 कृष्ण मंजिरी खुप छान

    ReplyDelete
  3. सुंदर विवेचन कृष्ण मंजिरी तर अप्रतिमच

    ReplyDelete
  4. Khup khup shubhechha... Kiti Sahaj sundar lihile aahe..

    ReplyDelete
  5. छान लिहिलय..मनःपूर्वक अभिनंदन

    ReplyDelete

पुनश्च हरि ॐ !

  (दि.२१ जून २०२२ रोजी योगाभ्यास करताना सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यांसमवेत संपूर्ण प्राध्यापक वर्ग    ) .   पुनश...