Monday, 11 October 2021

गुणातीत

                


                                                                           

  गुणातीत

पहाटेचे पाच वाजलेले. रस्त्यावरचे लाईट गेलेले. एक दोन घरांचे दिवे सुरू होते. रस्त्यावर पडलेल्या पावसाच्या पाण्यात त्यांचा प्रकाश चमकत होता. बाकी सारे चराचर स्थिर आणि नि:स्तब्ध ! आकाशामध्ये असलेली चांदणी सुद्धा लुकलुकत नव्हती. अंधार दाटलेला. अशावेळी श्री. रवींद्रनाथ टागोर यांची कविता आठवली.

विपत्तिमध्ये तू माझे रक्षण कर

ही माझी प्रार्थना नाही.

विपत्ती मध्ये मी भयभीत होऊ नये

इतकीच माझी इच्छा!......

सुखाच्या दिवसात नतमस्तक होऊन

मी तुझा चेहरा ओळखावा ;

दु:खाच्या रात्री सगळे जग

जेव्हा माझी फसवणूक करेल

तेव्हा तुझ्याविषयी

माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये

इतकीच माझी इच्छा!

काळ्याकुट्ट अंधारातही माझा तुझ्यावरचा विश्वास यत्किंचितही कमी होऊ नये. सगळ्यांनी माझी साथ सोडली तरी तुझ्यावरची माझी श्रद्धा अढळ राहावी, परमेश्वराला केलेली ही प्रार्थना माणसाला संतुलित सामर्थ्य प्रदान करते.

कदाचित संतुलित सामर्थ्याची हीच अपेक्षा व्यक्त करते, महर्षी पतंजलींचे १६ वे योगसूत्र.

तत्परं पुरुषख्यातेर्गुणवैतृष्ण्यम् ||१६||

(सूत्र क्र. १६, समाधिपाद, पातंजल योगदर्शन)

 योगग्रंथांच्या आधारेच आजचे हे सूत्र समजावून घेऊयात. ‘भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातंजल योगदर्शन’ या ग्रंथामध्ये ‘योगाचार्य कृष्णाजी केशव कोल्हटकर’ सूत्रार्थ स्पष्ट करताना लिहितात, “चित्ताहून पुरुष वेगळा आहे, असा विवेक उत्पन्न होणे ही पुरुषख्याती होय. अशा प्रकारची पुरुषख्याती झाल्यामुळे सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांविषयी जे वैतृष्ण्य उत्पन्न होते ते परवैराग्य होय.”

बाराव्या सूत्रांत, अभ्यास आणि वैराग्य यांच्या योगाने चित्तवृत्ती निरोध होतो असे सांगितले. तेरा आणि चौदा या दोन सूत्रात अभ्यासाचे स्वरूप सांगितले. पंधराव्या सूत्रात वशिकार-संज्ञक वैराग्याचे स्वरूप सांगितले. आता असंप्रज्ञात समाधीद्वारा पुरुषख्याती म्हणजे आत्मसाक्षात्कार झाल्यावर जे फलरूप वैराग्य उत्पन्न होते, त्याचे स्वरूप या सोळाव्या सूत्रात सांगितले आहे.

स्वामी आनंदऋषी, ‘पातंजल योगदर्शन – एक अभ्यास’ या ग्रंथात सोळाव्या सूत्राचे स्पष्टीकरण देताना लिहितात,  

“अंतिम वैराग्य म्हणजे ‘पुरुषा’च्या ज्ञानामुळे विकसणारे सत्त्व, रज, तम या त्रिगुणांबाबतचे वैराग्य, म्हणजेच गुणवैतृष्ण्य होय. सत्त्व, रज व तम हे तीनही गुण जीवात्म्याला भोगाकडे नेतात. याला भोगार्थता म्हणतात. तम-रज शांत झाले म्हणजे व सत्त्वगुण विकसित झाला, म्हणजे तो सत्त्वगुण जीवात्म्याला, साधकाला कैवल्याच्या दिशेने नेतो. याला अपवर्गार्थता म्हणतात. जीवात्म्याची किंवा चित्ताची भोगार्थता संपून अपवर्गार्थतेची सुरुवात होणे, म्हणजे चित्तवृत्तीनिरोधाची सुरुवात. ही अपवर्गार्थता जेव्हा संपुष्टात येते, तेव्हा त्या अवस्थेला असंप्रज्ञात समाधी म्हणतात. 

योगाचार्य कोल्हटकर सांगतातयोग्याचे चित्त असंप्रज्ञात समाधीत वृत्तिशून्य आणि संस्कारशेष अशा भावास प्राप्त झालेले असते. समाधीत ‘तदा द्रष्टु: स्वरूपेSवस्थानम्’ असते. यामुळे आत्मसाक्षात्कार हा येथेच होतो. तरीपण यावेळी चित्त निर्वृत्तिक असल्याने आत्मसाक्षात्काराचा वृत्ती रूपाने परामर्श या अवस्थेत शक्यच नसतो. या असंप्रज्ञात समाधीतून योग्याचे प्रारब्धवशात व्युत्थान झाले म्हणजे या अवस्थेचा वृत्तीरूप परामर्श चित्तावर आरूढ होतो. गाढ झोपेत, झोपेतील अनुभवाची वृत्तीरूपाने जाणीव नसते. परंतु उठल्यावर ‘सुखमहमस्वाप्सम’ म्हणजे, मी सुखाने झोपलो असा निद्राकालीन अनुभवाचा स्मृतिरूप परामर्श चित्तात वृत्तीरूपाने उदित होतो. असाच प्रकार असंप्रज्ञात समाधीतून योग्याचे उत्थान झाले म्हणजे घडून येतो. म्हणजे असंप्रज्ञात समाधीत जो आत्मसाक्षात्कार घडत असतो, त्याचा परामर्श व्युत्थानदशेत वृत्तिरूपाने होऊ लागतो. मी असंग आहे, सत्य-ज्ञानानंदरूप आहे इत्यादी वृत्तींनी हा परामर्श व्यक्त केला जातो.

‘पातंजल योग - विज्ञाननिष्ठ निरूपण’, या ग्रंथात डॉ.प.वि.वर्तक लिहितात,‘पुरुष’ म्हणजे परमात्मा. पुरुष या शब्दाची फोड ‘पुरे शेते इति’ - शरीरात झोपलेला तो पुरुष अशी सर्व तज्ञ करतात. पण परमात्मा शरीरात झोपत नाही. तो जागाच असतो. आपण झोपलो तरी आपलं पचन, श्वसन, रक्ताभिसरण, चालू असतं. पंचप्राणांच्या क्रिया चालू असतात. आपली वाढ होत असते. शरीरशास्त्राच्या दृष्टीने परमात्मा झोपत नाही, हे नक्की.

त्यांनी स्वत: पुरुष या शब्दाची फोड, ‘पुरं उषति इती’, अशी केलेली आहे. जो कोणी शरीराचा व्यवहार चालवतो, तो पुरुष. ‘उष्’ या धातूचा अर्थ जीवन कंठणे, जाळणे, पीडणे असा आहे. आपलं शरीर खरोखरच जळत असतं. ऑक्सिजनशी सतत संयोग सुरू असल्यामुळे शरीरात उष्णता असते. आपल्याला या शरीरातच भोग भोगावे लागतात व पीडा सहन कराव्या लागतात. या पीडा देणारा आत्मा शरीरातच वसलेला असतो. आपले सर्व जीवन व्यवहार चालवणारी, शरीरातच वसलेली शक्ती म्हणजे ‘पुरुष’ म्हणजेच आत्मा होय. योग्याला हा आत्मा समजतो. एकदा या आत्म्याचे ज्ञान झाले म्हणजे निर्गुण - निराकार अवस्था कळते. निर्गुण-निराकार अवस्थेतील गोडी कळते आणि मग साहजिकच गुणांबद्दलची ओढ किंवा आदर किंवा आवड कमी होते किंवा नाहीशी होते.

वशीकार-संज्ञक वैराग्य प्राप्त झालेल्या माणसांना व सामान्य माणसांना गुणांबद्दल आदर असतो. गुण हवेहवेसे वाटतात. चांगले गुण मिळविण्याची खटपट प्रत्येकजण करीत असतो. मी दिसायला चांगला असावा, माझी बुद्धी चांगली असावी, मन चांगलं असावं, शरीर चांगलं असावं, मला पत्नी, पुत्र, कन्या चांगल्या मिळाव्या, मित्र चांगले मिळावे, शत्रू चांगले मिळावे, ऐश्वर्य चांगले मिळावे, दृष्टांत चांगला मिळावा, साक्षात्कार चांगला व्हावा, चांगला स्वर्ग मिळावा किंवा अन्य चांगला परलोक मिळावा, अशी प्रत्येकाची तहान असते. पण ही गुणांची तृष्णा सुद्धा नाहीशी होते त्यावेळी परमवैराग्य येते.

आपल्याला हे तत्त्वज्ञान एकदम पटणार नाही कारण आपल्या कल्पना संकुचित असतात. दृष्टीही संकुचित असते. जड सृष्टीच्या, व्यवहाराच्या संकुचित भूमिकेतून सर्व चांगले गुण हवेत, असे वाटते. गुण वंदनीय, स्वीकारार्ह वाटतात. पण एकदाका आत्म्याचा साक्षात्कार झाला की विशाल दृष्टीकोन प्राप्त होतो आणि चांगले चांगले म्हणले जाणारे चांगले असतेच असे नाही व वाईट ठरलेले वाईट असतेच असे नाही, हे कळते. चांगले-वाईट हे भेद मानवी दृष्टिकोनातून झालेले आहेत. आत्म्याला चांगले-वाईट हा भेदच नाही कारण दोन्ही यातूनच उत्पन्न झाले आहे. तो निर्गुण आहे. निर्गुण ही कल्पनाच आपणाला पेलत नाही. गुण नसणे म्हणजे काय, काहीतरी गुण असणारच, असे सामान्य माणसाला वाटते पण निर्गुण ही अवस्था खरोखरच असते. त्या अवस्थेत सर्व गुण एकत्र असतात. हे मनाला पटणारे पण बुद्धीला गोंधळात टाकणारे विवेचन स्पष्ट करताना डॉ. वर्तक उदाहरण देतात, थंडी व उष्णता हे दोन भिन्न गुण आहेत असं आपण मानतो. 

पण खरी तशी स्थिती नाही. 100डिग्री सेंटीग्रेड म्हणजे परम उष्णता असे आपण मानू. उणे 100  डिग्री सेंटीग्रेड, म्हणजे कमाल थंडी असे आपण मानू. या दोन्ही स्थिती + 100 अंश सेल्सिअस आणि - 100 अंश सेल्सिअस = शून्य अंश सेल्सिअस इतके तापमान होईल. हीच शून्यावस्था, हीच निर्गुण अवस्था. याच शून्य अवस्थेच्या एका बाजूस उष्णता तर दुसर्‍या बाजूस थंडी असते. म्हणजे शून्यातूनच दोन्ही गुण निर्माण होतात. 100 फूट उंच व 100 फूट खोल हे दोन भिन्न गुण आहे, असं आपण मानतो. 

पण दोन्ही एकत्र केले तर उंचवटा नाहीसा होईल व खड्डाही नाहीसा होईल. म्हणजेच समानता येईल. या समानतेला निर्गुण शून्यावस्था म्हणतात. यातूनच एका बाजूला ढीग व दुसऱ्या बाजूला खड्डा निर्माण होतो. हीच कल्पना सूक्ष्म करून सर्व गुणदोषांना लावली म्हणजे, निर्गुणाची कल्पना येईल. शीत–उष्ण, उंच-सखल, प्रकाश-अंधार, धन-ऋण, सुष्ट-दुष्ट, सज्जन-दुर्जन इत्यादी सर्व द्वंद्व एकत्र केली म्हणजे, जे होईल ते निर्गुण होय. निर्गुणातूनच ही द्वंद्वे बाहेर पडलेली आहेत. या निर्गुण आत्म्याचा एकदा साक्षात्कार झाला की खरे ज्ञान होते. हे सत्य ज्ञान झाले की कुठल्याच गुणाबद्दल ओढ राहत नाही. मला हा गुण प्राप्त व्हावा अशी तृष्णा राहात नाही. अशा गुणाचा माणूस किंवा प्राणी मला जास्त आवडतो, अशी वृत्ती राहत नाही. सर्व गुण सारखेच असा समभाव निर्माण होतो. या स्थितीलाच गुणवैतृष्ण्य किंवा गुणांबद्दलची विरक्ती, असं म्हणलं आहे.

 दैनंदिन, व्यावहारिक जीवनात निर्माण होऊ शकणारा एक धोकाही डॉ. वर्तक स्पष्ट करतात, गुणांबद्दलची विरक्ती याचा अर्थ कुठल्याच गुणाबद्दल विशेष प्रेम राहत नाही पण याचा अर्थ सद्गुणांबद्दल द्वेष व दुर्गुणांबद्दल प्रेम, असा नव्हे. तरीही दुर्दैवाने तसा अर्थ केला जातो. ही विरक्ती आली की स्वच्छतेबद्दल विशेष आवड राहत नाही. पण मुद्दाम स्वच्छ जागा सोडून उकिरड्यात राहायचं असं नाही. खरी परम विरक्ती ज्याला प्राप्त होईल तो असेल त्या जागी आनंदात राहील. मग तो राजवाडा असो की उकिरडा असो. त्याला मिळेल ते अन्न तो आनंदाने खाईल; मग श्रीखंड असो की अंबोण असो. परम विरक्त ज्ञानी एखाद्या संतावर प्रेम करेल, तेवढेच दुष्टावरही प्रेम करेल. 

पण संतांकडे दुर्लक्ष करून दुष्टाला जवळ करणार नाही. दुष्टाकडून सुद्धा परब्रह्माचे कार्य होत असते हे त्याला कळते एवढेच. खरा परम विरक्त मनुष्य स्वर्ग लोकाचीही अभिलाषा धरत नाही. मला स्वर्ग मिळावा किंवा ब्रह्मलोक मिळावा अशी इच्छा सुद्धा त्याच्या मनात निर्माण होत नाही. ही श्रेष्ठतम विरक्ती होय. अशी विरक्ती मिळवण्याचा सतत प्रयत्न आपण केला पाहिजे. स्वामी आनंद ऋषी सांगतात-जेव्हा त्रिगुणांची भोगापवर्गार्थता संपते तेव्हा योग्याला त्रिगुणांविषयी एक अलिप्तता वाटते. अंतर्यामीच्या दृष्ट्या पुरुषाच्या अनुभूतीमुळे ही अलिप्तता किंवा गुणवैराग्य प्राप्त होते. ही असंप्रज्ञात समाधीची सुरुवातीची सबीज अवस्था असते. आता कैवल्य अवस्थेला नेणारी निर्बीज समाधी किंवा धर्ममेध समाधी फारशी दूर नसते. अंतिम निर्बीज असंप्रज्ञात समाधी-अवस्था त्रिगुणातीत असते. 

सामान्य भाषेत सांगायचं तर म्हणता येईल की या गुणांविषयीच्या विरक्तीत अवगुणांविषयीची विरक्तीही सामावलेली आहे.  त्रिगुण जातात ते त्यांच्या दोन्ही बाजूंसकट जातात. त्यामुळे खऱ्या विरक्त माणसाची नेहमी सहजावस्था असते. तो सहजतेने जगतो, यदृच्छेने प्राप्त होणाऱ्या सर्व गोष्टींचा तो स्वीकार करतो.

सूत्राच्या विवेचनाने एक समाधान मनात पसरले आणि मन आपोआप बा. भ. बोरकरांचे गीत गुणगुणू लागले –

 

झिणिझिणि वाजे बीन

सख्या रे, अनुदिन चीज नवीन .....

अलख निरंजन वाजविणारा

सहजपणांत प्रवीण !

 वृंदा आशय

 

 

 

 

Monday, 4 October 2021

प्रत्यय कृष्णसुखाचा !

 



                                             कवी - अनामिक

प्रत्यय कृष्णसुखाचा !


         पहाटेचे साडेचार वाजले की, अंगणाची ओढ लागते. त्या ओढीकडे दुर्लक्ष करून, समोरच्या पुस्तकात लक्ष घालून कितीही वाचू म्हणलं, तरी लक्ष लागत नाही. प्रयत्न केला तरी ते  शक्य होत नाही. तो मन खेचून घेऊन जातो, मग पावलं वळायला कितीसा वेळ लागणार ?

     दार उघडून अंगणात गेले. पावसाळी वातावरण. सारी सृष्टी सांद्र झालेली. फांद्या, पानं, फुलं जागच्याजागी डोलून स्वतःचा आनंद व्यक्त करत होती. सृष्टीत भरून राहिलेल्या कृष्णाला पाहून आनंदित होणारी ही फुलं-पानं मोठी मनमोहक दिसत होती. नुकतंच दीर्घश्वसन झालेलं होतं. त्यामुळे पारिजातकाचा सुगंध खोलवर गेला. कृष्ण–रुक्मिणी-सत्यभामा सगळ्यांची त्या सुगंधानं आठवण करून दिली. इतक्यात चांदीपाटाचं फूल आपसूक गळून पडलं. झाडावरचं फूल पडताना निवांतपणं पाहण्यात, काय सौंदर्य साठवलेलं आहे, याचा प्रत्यय घेतला. या सगळ्या सृष्टीत भावोत्कट झालेली मी कृष्णचरणी समर्पित झाले आणि नंतर क्षणात तटस्थता अनुभवली. अनुभवाच्या या दोन टोकांनी, मी चकित झाले. पण त्याचं काम त्यानं केलेलं होतं. कृष्णार्पणमस्तु!

     वळूयात महामुनी पतंजलीच्या पंधराव्या सूत्राकडे. सूत्र आहे वैराग्याचे. वैराग्य हे वृत्तीत असते. देवाने जे दिले त्यात समाधान मानून इतर काही मिळण्याची इच्छा न होणे, म्हणजे वैराग्य होय. श्रीमद्भगवद्गीता (६.३५) आणि  योगसूत्रे  यांमध्ये (१.१२) चित्ताच्या सतत उत्पन्न होणाऱ्या वृत्तींना निरुद्ध करण्याचे दोन उपाय सांगितले आहेत – अभ्यास आणि वैराग्य. ज्याप्रमाणे नदीला बांध घालून तिचे पाणी योग्य दिशेला वळविता येऊ शकते, त्याचप्रमाणे अनर्थकारी विषयांकडे जाणाऱ्या चित्ताला वैराग्याद्वारे नियंत्रित केले जाते व अभ्यासाद्वारे योग्य मार्गाकडे नेले जाते. ज्ञानसहित वैराग्य हेच कैवल्य उत्पन्न करते हा गर्भितार्थ स्पष्ट करणारे १५ वे सूत्र पुढीलप्रमाणे -

 

दृष्टानुश्रविकविषयवितृष्णस्य वशीकारसंज्ञा वैराग्यम् || १५||

( पातंजल योग, समाधिपाद, सूत्र क्रमांक १५ )

याचा सूत्रार्थ सांगताना योगाचार्य कोल्हटकर सांगतात, “ज्यांचा प्रत्यक्ष अनुभव घडला ते दृष्ट विषय आणि शास्त्रादिकांवरून जे समजले ते आनुश्रविक विषय होत. या दोनही प्रकारच्या विषयांविषयीं जी तृष्णा म्हणजे आसक्ती ती ज्याच्या चित्तातून नाहीशी झाली आहे अशा वितृष्ण पुरुषाचें विषयाविषयी जे वैतृष्ण्य म्हणजे वैराग्य ते वशीकारसंज्ञक  वैराग्य होय.”

या विषयात दृष्ट विषय आणि आनुश्रविक विषय असे दोन प्रकार आहेत. (दृष्ट आणि दुष्ट हे दोन शब्द पूर्णत: निराळे आहेत, हे आवर्जून नमूद करावेसे वाटते.) दृष्ट म्हणजे इंद्रियांच्या द्वारा ज्यांचा अनुभव आपल्याला प्रत्यक्ष येथे घेता येतो आहे, असे शब्द, स्पर्श, इत्यादी भोग्य पदार्थ. आनुश्रविक म्हणजे शास्त्र, परंपरा, आप्त यासारख्या विश्वासार्ह व्यक्ती, इत्यादिकांकडून ऐकून माहीत झालेले स्वर्ग, अमृतयासारखे विषय. सामान्य माणसांच्या अंत:करणात या दोनही प्रकारच्या विषयांसंबंधी 'हे विषय उपभोगार्थ मला मिळावेत’ अशा प्रकारची तृष्णा असते.

मराठी विश्वकोशामध्ये याचा संदर्भ मोठा छान स्पष्ट केलेला आहे. त्यातील नोंदीत,  समीक्षक : कला आचार्य’ लिहितात,  योगसूत्रांमध्ये (१.१५, १.१६) दोन प्रकारच्या वैराग्याचे वर्णन केले आहे – अपरवैराग्य आणि परवैराग्य. अपरवैराग्य म्हणजे योगसाधनेच्या प्रारंभिक स्थितीमध्ये असणारे वैराग्य होय. दृष्ट म्हणजे लौकिक जगतातील अन्नपान, स्त्रीसुख इत्यादी भौतिक विषयांप्रती आणि आनुश्रविक म्हणजे अलौकिक जगतातील स्वर्ग, अप्सरा  इत्यादी दिव्य विषयांप्रती असणारी आसक्ती नष्ट होणे म्हणजे अपरवैराग्य होय.

वाचस्पती मिश्र आणि विज्ञानभिक्षु या व्याख्याकारांनी अपरवैराग्याच्या चार अवस्था वर्णिलेल्या आहेत – यतमान, व्यतिरेक, एकेन्द्रिय आणि वशीकार. योगी क्रमाने या चार अवस्थांना पार करतो.

(१) यतमान : सामान्यत: राग, लोभ इत्यादी चित्तातील विकारांमुळे इंद्रिये नेहमी विविध विषयांकडे आकृष्ट होत असतात. ती आकृष्ट होऊ नये या दृष्टीने केला जाणाऱ्या प्रयत्नांचा आरंभ म्हणजे यतमान अवस्था होय. या अवस्थेमध्ये संपूर्ण वैराग्य साध्य होत नाही, परंतु वैराग्यभावना उत्पन्न होण्याच्या दृष्टीने योग्याची वाटचाल सुरू होते.

 

(२) व्यतिरेक : विषयांप्रती असणारी आसक्ती नष्ट होण्याच्या उद्देशाने सतत प्रयत्न केल्यावर काही वस्तू अथवा विषयांच्या बाबतीतील राग, लोभ इत्यादी दोष नष्ट होतात; परंतु अन्य काही वस्तूंप्रती योग्याच्या मनात राग, लोभ अजूनही शिल्लक असतो. कोणत्या विषयासंबंधी दोष नष्ट झाले आहेत व कोणत्या विषयासंबंधी अजून शिल्लक आहेत, याचे तटस्थ भावनेने परीक्षण करणे ही वैराग्याची व्यतिरेक अवस्था होय.

 

(३) एकेन्द्रिय : बाह्य इंद्रियांवर संपूर्ण नियंत्रण प्राप्त झाल्यावर ती इंद्रिये शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या विषयांप्रती आसक्त होत नाहीत. परंतु, पूर्वकाळातील अनुभवांमुळे चित्तामध्ये सुप्त रूपाने राहिलेले ते रागादि दोष अजूनही संस्कार रूपाने विद्यमान असतात व पुन्हा जागृत होण्यासाठी उत्सुक असतात. मनाद्वारे त्या सुप्त संस्कारांचे व्यवस्थापन करणे व पुन्हा त्यांना जागृत होऊ न देणे ही वैराग्याची अवस्था म्हणजे एकेन्द्रिय होय. मनरूपी एकाच इंद्रियाद्वारे रागदोषावर नियंत्रण केल्यामुळे या अवस्थेला ‘एकेन्द्रिय’ अशी संज्ञा आहे.

 

(४) वशीकार : ज्यावेळेस बाह्य इंद्रियेही विषयांपासून विरक्त होतात, चित्तातील सुप्त संस्कारही जागृत होऊ इच्छित नाहीत आणि योग्याचे चित्त पूर्णपणे वैराग्यभावनेने युक्त असून त्याच्या नियंत्रणातही असते, त्या अवस्थेला वशीकारनामक वैराग्य असे म्हटले जाते.

वरील चार अवस्थांमध्ये ‘वशीकारसंज्ञक वैराग्य’ हेच सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे पतंजली ऋषींनी सूत्रामध्ये फक्त वशीकार वैराग्याचाच नामोल्लेख केलेला आहे. कारण अन्य तीन प्राथमिक अवस्थाही त्यात गृहीतच आहेत.जीवनात तीव्र दु:खाचा अनुभव आल्यावर व्यक्तीच्या मनात काही काळापुरते वैराग्य उत्पन्न होते, परंतु ते तात्कालिक आणि नैमित्तिक असल्यामुळे योगसाधनेमध्ये त्याला महत्त्व नाही. चित्तामध्ये वैराग्याची भावना दृढ झाल्यावरच सर्वश्रेष्ठ ज्ञान प्राप्त होते व चित्तवृत्ती निरोधाद्वारे कैवल्य अवस्था प्राप्त होते, असे योगदर्शन मानते.

योगाभ्यासास प्रवृत्त झालेला विवेकी मनुष्य अशा विषयांविषयी वितृष्ण झालेला असतो. विवेकाच्या तारतम्याने वैराग्याच्या स्वरूपात आरंभीच्या प्रयत्नापासून तो वैतृष्ण्यरुपी अंतिम सीमा गाठली जाईपर्यंत या उत्तरोत्तर श्रेष्ठ अवस्था प्राप्त होत असतात. त्या चार असून त्यातील सर्वात श्रेष्ठ अशी अवस्था म्हणजे वरील ‘वशीकारसंज्ञक वैराग्य’ होय.

वैराग्य हे वृत्तीतच असते, हे स्पष्ट करणारी एक कथा अगदी थोडक्यात पाहूयात. एक आश्रम होता. गुरूंची गादी चालवण्यासाठी योग्य शिष्याची निवड त्याठिकाणी करायची होती. गुरुजींनी सगळ्या शिष्यांना आधीच सांगितलेलं होतं, “ नियमांचे पालन काटेकोरपणे करणा-यालाच गादीचा वारस होता येईल.”  नियमांचे शक्य तेवढे कडक पालन करत, आता कोणाला हा वारसा मिळणार याची उत्सुकता प्रत्येकाच्याच मनात होती.

 एकदा हे सगळे शिष्य दूरवरच्या नदीकाठी फिरायला म्हणून गेले. नदी ओलांडताना एका स्त्रीनं त्यांची मदत मागितली. तिलाही नदी ओलांडून जायचं होतं. तिला पलीकडे नेणार कसं?, हा प्रश्न होताच. शेवटी त्या एका शिष्याने त्या स्त्रीला आपल्या पाठीवरती घेतलं आणि नदी पार करून दिली. बाकी शिष्य मनातल्या मनामध्ये आनंदित झाले, की वारसा हक्काच्या गादीतून हा वगळला गेला.

चार दिवसांनी गुरुजींनी सर्वांना बोलावलं. गादीचा वारस नेमला गेला. पाठीवरती महिलेला घेऊन नदी ओलांडणाऱ्या शिष्याचीच वारस म्हणून नेमणूक झाली. सगळेच आश्चर्यचकित झाले. सरतेशेवटी गुरुजींना प्रश्न विचारला, “तुम्ही या शिष्याची निवड कशी काय केली? आपल्याकडे स्त्रीचा स्पर्श, स्त्रीचे चिंतन वर्ज्य  मानले जाते. यांनी तर परवा एका महिलेला पाठीवरती घेऊन नदी ओलांडून दिली.” गुरुजींनी स्मित केलं आणि ते एवढेच म्हणाले, “त्याने त्या महिलेला नदीपल्याड सोडून दिलं, तेव्हाच सोडून दिलं; पण तुम्ही मात्र तिला इथपर्यंत घेऊन आलात आणि गेल्या चार दिवसांपासून तुमच्या मनामध्ये तिला वागवत आहात.”

वैराग्य म्हणजे जबाबदारी टाळणे नव्हे तर कर्माची जाणीव न होता पूर्ण कर्म करणे. वैराग्यामध्ये सामर्थ्य अपेक्षित आहे. हा देश  संन्याशांनी चालवलेला आहे. ऋषी-मुनींनी जंगलामध्ये तप करून संसार कसा असावा, याची सूत्रं आखून दिलेली आहेत. जिथे कमी तिथे आम्ही या  भूमिकेतून वैराग्याने नि:संग कर्तव्यपूर्ती केलीच पाहिजे.
     वैराग्य  वैर आणि प्रेम यांच्या पलीकडे जाणारे असते.कोणाशीही नीतीने वागू शकणारा तो विरागी असतो.राग म्हणजे आसक्ती तर वैराग्य म्हणजे आसक्तीचा अभाव. वैराग्य भावरूप (अस्तित्वरूप) नाही तर अभावरूप आहे. 

श्रीकृष्णांनी सांगितलं, उपभोगून पलीकडे गेल्यावर येणारं वैराग्य असंच सृष्टीसारखं ओलं, स्निग्ध, सांद्र असतं. त्यात रुक्षता, कोरडेपणा, रखरखीतपणा येत नाही. उपभोगताना तन्मय होऊन उपभोगावे आणि उपभोगून झाल्यावर क्षणभरही तिथे अडकू नये. नि:संग, निरामय होऊन पुढे चालावं. हातावेगळं केलं की मनावेगळं करावं,वैराग्य  यापेक्षा निराळं ते काय असणार? अनुरागात, रागात आणि वैराग्यात सर्वत्र कृष्णच आहे.त्याला शरण गेले की कृष्णसुखाचा प्रत्यय येतो.

हे सर्वव्यापी श्रीकृष्णा, तुझ्या चरणी पूर्णपणे समर्पित होऊन, तुझे नाम धारण करण्याची अनुमती दे, हीच प्रार्थना! 

कृष्णसखी,

वृंदा आशय

 

  

पुनश्च हरि ॐ !

  (दि.२१ जून २०२२ रोजी योगाभ्यास करताना सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यांसमवेत संपूर्ण प्राध्यापक वर्ग    ) .   पुनश...