Monday, 30 August 2021

गंध स्मृतींचा !

 

गंध स्मृतींचा !

पहाटेचे चार वाजलेले आहेत. ब्राह्ममुहूर्ताची वेळ ! नकळत घराचा दरवाजा उघडला आणि अंगणात येऊन उभी राहिले. भुरभूर पाऊस सुरू आहे. रस्त्यावरच्या लाईटच्या प्रकाशात डांबरी रस्ते चमकत आहेत. निसर्गातला मंद अंधार सृष्टीची मोहकता वाढवतो आहे. ओली झालेली फुलझाडं या प्रकाशात स्वत:च्या रंगासह कृष्ण-धवल दर्शन देत आहेत. सृष्टी मध्ये शांततेचा नाद आहे.

हा पडणारा पाऊस, निसर्गातली शांतता माझ्या पंचज्ञानेंद्रियांच्या संवेदना जाग्या करत आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबाचा आवाज कानामध्ये झिरपत चाललेला आहे. छपरावरचा पाऊस, जाळीवरचा पाऊस, झाडावरचा पाऊस, झोपाळ्याच्या कौलारू छतावरचा पाऊस ! प्रत्येक ठिकाणच्या थेंबाचा आवाज निराळा. लाईटच्या प्रकाशात चमकणारे, भिजलेले काळे डांबरी रस्ते पावलांना वेध लावत आहेत. रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या काळ्या मातीचा कृष्णगंध मनामध्ये दरवळतो आहे.... आणि या मृद्गंधाने मला थेट संस्कृतीच्या मुळापाशी नेऊन सोडलं! सृष्टीतला श्यामवर्ण..... मातीचा कृष्णगंध..... आज श्रीकृष्ण जयंती ! ॐ नमो भगवते वासुदेवाय !

‘कृष्ण’ एक शब्द मनामध्ये उमटला. त्याच्या किती प्रतिमा ! तो बाळक्रीडा करणारा, श्रेयस आणि प्रेयस यांच्या संघर्षात न अडकता दोन्हींनाही यथोचित न्याय देणारा, सहज कर्तृत्व गाजवून कंसवध करणारा, कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीता सांगून त्याचे सामर्थ्य जागवणारा, महाभारत घडवणारा आणि ‘यदा यदा ही धर्मस्य....’ असे अभिवचन देऊन भारताला आश्वस्त करत, विश्वकल्याण साधणारा कालातीत श्रीकृष्ण !  

ज्याने कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग सांगितलेला आहे, त्याचे स्मरण करत महर्षी पतंजलींच्या ‘स्मृती’ ही मनाची वृत्ती स्पष्ट करणाऱ्या ११ व्या सूत्राचे चिंतन करायचे आहे. काय हा मणिकांचन योग ! परमेश्वरा मनोभावे वंदन, संपूर्ण समर्पण !!

अनुभूतविषयासंप्रमोष:  स्मृति: ||११||

(पातंजल योगदर्शन, समाधिपाद, सूत्र क्र. ११)

     या सूत्राचा सूत्रार्थ स्पष्ट करताना ‘राजयोग’ ग्रंथात, स्वामी विवेकानंद लिहितात,प्रत्यक्ष अनुभवलेले विषय त्यांच्या वृत्ती मनातून नाहीसे न होता संस्कारांच्या रूपाने जाणिवेत परत येण्याला स्मृती म्हणतात. स्मृतीचे भावित आणि अनुद्भावित असे दोन प्रकार आहेत.’ तर योगाचार्य कृष्णाजी कोल्हटकर त्यांच्या ग्रंथात स्पष्ट करतात, ‘पूर्वी अनुभवलेल्या विषयांचा असंप्रमोष म्हणजे त्या अनुभवामुळे चित्तांत उत्पन्न होणारे त्या विषयाचे अनुसंधान, ही स्मृती होय’. डॉ. प.वि. वर्तक सांगतात, ‘अनुभव घेतलेल्या विषयाचा, परिपूर्ण नाश न होणे याचा अर्थ तो अनुभव तो विषय कुठेतरी शिल्लक असणे होय; त्यालाच स्मृती किंवा आठवण म्हणतात.’ ओशो लिहितात, - स्मृती ही मनाची पाचवी वृत्ती आहे. तिचा उपयोग किंवा गैर उपयोग होऊ शकतो. जर स्मृतीचा गैर उपयोग झाला तर ती गोंधळ निर्माण करते.

दैनंदिन जीवनात आपण ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने किंवा मनाने अनुभव घेत असतो. हा अनुभव बऱ्याच वेळेला घर करून मनात राहतो किंवा आठवत तरी राहतो. अनुभव घेतानाची बाह्य सदृश्य परिस्थिती समोर असणे किंवा सुप्तावस्थेतील विशिष्ट संस्कार जागा होणे यामुळे अनुभव विषयाचं पुन्हा प्रकटीकरण होतं, यालाच ‘स्मृती’ म्हणतात. ही स्मृती मनाची वृत्ती आहे. विषय ज्ञानेंद्रियाने भोगवून संपवला तरी अनुभव नाहीसा होत नाही. ही नाहीसे न होण्याची प्रवृत्ती म्हणजे स्मृती. अनुभव घेतलेल्या विषयाभोवती पिंगा घालण्याची मनाची वृत्ती म्हणजेच स्मृती. मनाची ती वृत्ती असल्याने, मन त्याला वाटेल तेव्हा, स्मृतीत रममाण होते. ही स्मृती मनाला वाटेल तितकी वर्षे मागे भूतकाळात घेऊन जाते कोणाकोणाला गत जन्माच्या आठवणी देखील येतात. आपल्या मनाला स्थानापन्न व्हायला समोर प्रमाण नसेल, विपर्यय नसेल, विकल्प नसेल व निद्रा येत नसेल तर माणसाचे मन स्मृतिरंजन करीत बसते.

     सगळे योगाचार्य ‘स्मृती’ बद्दलचे असे शास्त्र स्पष्ट करत असले तरी सर्वसामान्य माणसासाठी ‘स्मृती जागवणे’ आणि काहीतरी ‘विस्मृतीत टाकणे’ ही एक मोठी कला आहे. ही कला ज्याला साध्य होते, त्याचे जीवन सुखी होते.मला काय आठवायचं आहे, काय विसरायचं आहे, आणि असे का करायचे आहे, याची स्पष्टता ज्याच्याजवळ असेल ना, त्याच्या आयुष्यात कुरकुरीला आणि तक्रारीला जागा राहत नाही. माझा मेंदू, माझे मन माझंच ऐकणार नसेल तर ‘माझा’ उपयोग काय? माझं इतरांनी ऐकावे असं जे मला वाटतं, त्याला अर्थ काय?

योगाचार्य कोल्हटकरांनी मोठे छान सांगितलेले आहे, “या वृत्तीरूप जंजाळाचा द्रष्टा आत्मा असल्यामुळे तो त्यापासून अगदी वेगळा असतो. पण तो वेगळा असल्याचा विवेक न होणे हीच अविद्या होय. या अविद्यारूप क्लेशाने युक्त असलेल्या वृत्ती क्लिष्ट वृत्ती होत. योग या क्लिष्ट वृत्तींचा निरोध करण्यास सांगतो.”

     व्यक्तिगत जीवनातल्या आठवणी हा तर ज्याचा – त्याचा प्रश्न आहे. पण या समाजजीवनात, राष्ट्र्जीवनात आपल्या काही सामूहिक जबाबदाऱ्या आहेत. ज्यांचे विश्वकल्याणात फार मोठे योगदान असणार आहे. तेव्हा माझ्या देशाला त्याच्या आध्यात्मिक स्वभावाची आत्मविस्मृती कधीच होऊ नये, एवढीच श्रीकृष्णचरणी प्रार्थना ! विश्वकल्याणासाठी प्रत्येक भारतीय कटिबद्ध आहे. त्याने ईशचरणी समर्पित व्हावे. ‘कर्मातचि तुझा भाग, तो फळात नसो कधी’, या नि:संगतेने ज्ञानपूर्ण, भक्तियुक्त कर्मयोग आचरावा. त्याच्या स्मृतींचा गंध स्थल-कालाच्या मर्यादा ओलांडून निरंतर दरवळत राहील.

वृंदा आशय     

Sunday, 22 August 2021

अभावातली संपन्नता !

 

अभावातली संपन्नता !

नमस्कार! आज राखी पौर्णिमा. आपल्या सगळ्यांना या राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा! मला अगदी स्वाभाविकपणे शाळेतली प्रतिज्ञा आठवते आहे. ‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत’. पण खरं सांगू का, या तंत्रज्ञानाने ही प्रतिज्ञा आता व्यापक केली आहे. “जग माझं घर आहे. सारे जगत् निवासी माझे बांधव आहेत.” इथे बसल्या बसल्या जगातल्या सार्‍या माणसांची भेट होऊ शकते. काय हवं अजून आपल्याला? आणि म्हणून या जगातल्या प्रत्येक निवासीला या राखी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!! ज्ञान आणि तंत्रज्ञान एकत्र आलं तर काय चमत्कार होऊ शकतो, याचा प्रत्यय घेतल्यासारखं वाटतं आहे मला. नाहीतर एरवी, ‘तंत्रज्ञान आपल्या आयुष्यावर स्वार होतंय, म्हणून मीही तक्रारच करायचे’

अगदी परवाच आपली भेट झाली आणि आज लगेच भेटतोय. तर मला वाटलं, मला स्वप्न पडते आहे की काय? पण नंतर लक्षात आलं की, आपल्या नियमित भेटीचा दिवस रविवारच आहे. मागच्या भेटीला जरा विलंब झाला होता. गप्पा मारता मारता आता मन भरकटायला लागले बरं. महर्षी पतंजली रागावतील. महर्षींच्या दहाव्या सूत्राकडे वळूयात -

अभावप्रत्ययालम्बना वृत्तिर्निद्रा || १० ||

(पातंजल योगदर्शन, समाधिपाद, सूत्र क्र. १०)

याचा सूत्रार्थ स्पष्ट करताना योगाचार्य कृष्णाजी केशव कोल्हटकर ‘भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातंजल योगदर्शन’ या ग्रंथामध्ये लिहितात पदार्थ मात्राच्या अभावाचा जो प्रत्यय म्हणजे अनुभव तो ज्या वृत्तीला आलंबन म्हणजे आधार असतो ती वृत्ती निद्रा होय.

‘राजयोग’ या ग्रंथात स्वामी विवेकानंद लिहितात- ‘शून्यत्वबोध हा ज्या वृत्तीचा आधार वा विषय असतो तिला निद्रा म्हणतात’.

डॉक्टर प. वि. वर्तक ‘पातंजल योगदर्शन : विज्ञाननिष्ठ निरूपण’ या ग्रंथाद्वारे प्रतिपादन करतात -  ‘अभावाच्या प्रत्ययावर अधिष्ठित असलेली वृत्ती म्हणजे निद्रा.’

निद्रा म्हणजे झोप. झोप हा आपल्या सगळ्यांचाच अगदी जिव्हाळ्याचा विषय. झोपेचे किती प्रकार ! रात्री हवी असते पण लागता लागत नाही, ती ‘खट्याळ झोप’. मध्यरात्री अगदी नकळत लागते ती ‘गाढ झोप’. पहाटे पहाटे उठायचं असतं पण उठवत नाही, आणि गोड स्वप्नांमध्ये रममाण होतो ती ‘साखर झोप’. झोपेबद्दल अनेक प्रकारचे भाव आमच्या मनामध्ये आहेत. आणि इतकी भावात्मकता  तिच्यामध्ये असताना ती अभावावर आधारलेली आहे म्हणजे काय?

अहो, आम्हीच काय आमचे देवसुद्धा झोपतात. काकड आरती, शेज आरती, देवशयनी एकादशी, कोजागिरी पौर्णिमा हे सर्व देवांच्या झोपण्या-उठण्याचे संकेत आहेत. इथे देवाला सुद्धा आम्ही आराम करायला लावतो, त्या झोपेवर आमचं किती प्रेम असेल. आणि त्या झोपेबद्दल आमचा भाव किती समृद्ध असेल बरं! मग योगशास्त्रातील ही अभावाची भानगड काय?

योगाचार्य कोल्हटकर म्हणतात, निद्रावस्थेत रजोगुणापासून निर्माण झालेल्या कर्मेंद्रियांची क्रियाशीलता आणि सत्त्वगुणापासून  निर्माण झालेल्या ज्ञानेंद्रियांची प्रकाशशीलता या दोन्हींमध्ये शिथिलता निर्माण झालेली असते. अशा वेळी आपल्या शरीरात केवळ स्थितीशीलता राहिलेली असते. या स्थितिशीलतेमध्ये कोणत्याही बाह्य स्थूल विषयांचे किंवा आंतरसूक्ष्म विषयांचे स्फुरण चित्तामध्ये होऊ शकत नाही. त्यामुळे सर्व वस्तूंच्या अभावाच्या अनुभवाचेच केवळ स्फुरण चित्तामध्ये होत असते. या अनुभवालाच या सूत्रात सर्व वस्तूंच्या अभावाचा प्रत्यय असे म्हणलेले आहे. इतर कोणत्याही वस्तूचे भान यावेळी होत नाही एवढेच एक भान चित्तात उरलेले असते . हीच या सूत्रात सांगितलेली अभावप्रत्ययालंबना वृत्ती होय.

डॉ. प. वि. वर्तक हे  स्पष्ट करताना सांगतात, अभाव म्हणजे काहीही नसण्याची स्थिती. भू म्हणजे असणे. त्यापासून भाव म्हणजे ‘असण्याची स्थिती’ असा शब्द निघाला व त्याला नकारात्मक ‘अ’ हा उपसर्ग लावून शब्द केला ‘अभाव’ म्हणजे नसण्याची स्थिती. येथे पूर्ण अभाव न धरता कमतरता किंवा तौलनिक अभाव जर घेतला तर नीट उलगडा होतो. प्रत्यय म्हणजे ज्ञान होणे. प्रत्यय या शब्दाची फोड प्रति + अय अशी आहे. ‘प्रति’ म्हणजे आमच्याकडे, ‘अय’ म्हणजे जाणे. एखाद्याकडे जाणे म्हणजे आपली इंद्रिये एखाद्या गोष्टीकडे जाणे, म्हणजेच ज्ञान होणे. या गोष्टीचा प्रत्यय मला मिळाला असे आपण म्हणतो, त्याचा अर्थ तो ‘अनुभव’ आला म्हणजेच ज्ञान झाले. पंचज्ञानेंद्रियांकडून ज्ञानरूपी संदेश येतात, त्यालाच प्रत्यय येणे असे म्हणतात. आतापर्यंत ज्या वृत्ती सांगितल्या आहेत त्या कुठल्यातरी प्रत्ययावर अवलंबून असतात. प्रत्यक्ष, अनुमान किंवा आगम ही ‘प्रमाणे’ प्रत्यय देणारी असतील अथवा समोरच्या वस्तूचे चुकीचे ज्ञान ‘विपर्यय’ तेथे असेल किंवा नुसताच शब्दानुपाती ‘विकल्प’ असेल. काहीतरी प्रत्यय देणारे तेथे असते. पण प्रत्यय देणारे काहीच नसेल तर अभाव झाला. अशा स्थितीत वृत्ती असते का? ‘होय’ असेच त्याचे उत्तर आहे. या वृत्तीला ‘निद्रा’ असे म्हणतात. ज्यावेळी प्रत्यय देणारे काहीच नसेल तेव्हा म्हणजे अभावाचा प्रत्यय असेल तेव्हा झोप येऊ लागते यालाच निद्रा असे म्हणतात.

आपल्या पंचज्ञानेंद्रियांना कुठलाही विषय समोर नसतो, त्यावेळी आपणास झोप येऊ लागते. मनाला कुठलेही काम नसते, त्यावेळी झोप येऊ लागते. म्हणजे प्रत्येकाच्या अभावाने निद्रा येते. प्रत्यक्ष प्रमाण नसते, आपण अनुमान करत नसतो, आपण आगम स्वीकारत नसतो, चुकीचे अर्थ काढत पर्यायात गुरफटलेले नसतो व विकल्पही करत नसतो त्या वेळी आपण झोपतो. म्हणून मनाची ही वृत्ती निद्रा आहे. मन हे चंचल असते त्यामुळे वृत्ती सारख्या बदलतात. प्रत्यक्ष प्रमाण समोर असताना आपण अनुमान करतो किंवा विपर्यय करतो किंवा विकल्पही मनात येतो. त्याचप्रमाणे या पाच वृत्ती आलटून पालटून चालू असताना सहावी निद्रा सुद्धा येऊ शकते. म्हणूनच तिला वृत्ती म्हणलं आहे. साधारणतः पहिल्या पाचांचा अभाव म्हणजे निद्रा होय. या सर्व वृत्ती आपण याआधीच्या एकेका सूत्रात सविस्तर समजावून घेतलेल्या आहेतच.

     निर्माण होणारा हा अभाव प्रमाण नसल्यामुळे निर्माण होईल, किंवा इंद्रियांच्या थकव्यामुळे निर्माण होईल. कसाही असला तरी हा भाव निद्रेचा कारक आहे हे निश्चित. निद्रा हीसुद्धा मनाची एक वृत्तीच आहे हा फार  मोठा सिद्धांत महर्षी पतंजलींनी मांडलेला आहे. इतर दर्शनकार निद्रेला वृत्ती मानत नाहीत ती सुषुप्ति अवस्था आहे असं ते म्हणतात.

     तमोगुणप्रधान वाटणा-या निद्रेचे स्वरूप योगनिद्रा मात्र पार बदलून टाकते. ३० मिनिटांच्या योगनिद्रेत चार तासांचा आराम देण्याची क्षमता आहे. चित्तावर विशिष्ट संस्कार ठसवण्यासाठी योगनिद्रा प्रभावी ठरते. सातत्याने केलेल्या योगनिद्रेचा अभ्यास झोपेलाही सजग ध्यानाचे रूप देऊ शकतो. ही फार पुढची अवस्था आहे. राग-लोभाला थारा न देता आपण किमान स्वस्थ व शांत मनाने झोपण्याची सवय स्वत:ला लावू शकलो, सद्विचारांनी निद्रेच्या अधीन होऊ शकलो तरी पुष्कळच काही साध्य केल्यासारखे आहे. पुरेशी आणि व्यवस्थित झोप ही संतुलित व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यावश्यक आहे. अर्थातच व्यक्तीनुसार, तिच्या जीवनशैलीनुसार आवश्यक झोपेचा कालावधी कमी – अधिक होऊ शकतो. असो.

योगसूत्रे अशी आहेत की निद्रा हा विषय मांडतात आणि जीवनाला एक नवी जाग आणतात. ज्ञानाची पौर्णिमा अशीच होत असते.

वृंदा आशय

Thursday, 19 August 2021

महात्म्य नामस्मरणाचे !

 

महात्म्य नामस्मरणाचे !

नमस्कार ! यावेळच्या इथल्या भेटीला जरा विलंब झाला. मात्र भेटीत खंड नव्हता याचा आनंद आहे. श्रीअरविंद केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण भेटी सुरु होत्या. पातंजल योगाकडून पूर्णयोगाकडे घेऊन जाणारा तो प्रवास निश्चितच मनमोहक, आनंददायी, समाधानकारक आणि प्रगतिपथावर नेणारा आहे. तूर्त वळूयात महर्षी पतंजलींच्या नवव्या सूत्राकडे.

शब्दज्ञानानुपाती वस्तुशून्यो विकल्प: ||९||

(पातंजल योगदर्शन, समाधिपाद, सूत्र क्र. ९)

सातव्या आणि आठव्या सूत्रात ‘प्रमाण’ आणि ‘विपर्यय’ या वृत्तींचा आपण परिचय करून घेतला. नवव्या सूत्रात ‘विकल्प’ या वृत्तीचे प्रतिपादन केलेले आहे. काही वेळा समोर कुठचीच वस्तू नसते तरी माझे मन ऐकलेल्या गोष्टींशी सरूपता साधते. ही तिसरी वृत्ती म्हणजे विकल्प होय.

 हा सूत्रार्थ स्पष्ट करताना योगाचार्य कृष्णाजी केशव कोल्हटकर ‘भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातंजल योगदर्शन’ या ग्रंथामध्ये लिहितात ‘शब्दापासून उत्पन्न झालेले जे ज्ञान ते शब्दज्ञान. शब्दज्ञानाच्या मागोमाग उत्पन्न होण्याचा ज्याचा स्वभाव आहे, पण जो वस्तुशून्य आहे, म्हणजे ज्याला आधाराला तशा प्रकारची वस्तूच नसते अशा स्वरूपाचा जो बोध तो विकल्प होय.’

तर ‘राजयोग’ या ग्रंथामध्ये स्वामी विवेकानंद सूत्रार्थ स्पष्ट करतात – ‘शब्द आहे पण त्याने सूचित होणारी वस्तू मात्र अस्तित्वात नाही, अशा शब्दाने होणाऱ्या ज्ञानाला विकल्प किंवा शब्दजन्य भ्रांती म्हणतात. हा विकल्प वस्तूविकल्प, क्रियाविकल्प आणि अभावविकल्प अशा तीन प्रकारचा असतो.’

तर डॉ. प.वि.वर्तक, ‘पातंजल योग - विज्ञाननिष्ठ निरूपण’ या ग्रंथात अगदी सोप्या पद्धतीने सांगतात, ‘वस्तू नसतानाही शब्दाच्या ज्ञानामागोमाग येतो तो विकल्प होय.’

अधिक स्पष्ट करताना ते लिहितात, आता हे योगशास्त्रावरील निरूपण वाचत असताना ‘वस्तू’ हा शब्द आपण वाचला. या शब्दाबरोबर आपणासमोर कुठलीतरी वस्तू उभी राहील व त्या वस्तूवरच तुमचे मन जाईल. एखादी वस्तू सापडत नसेल तर ते आठवेल व ती वस्तू कुठे असेल याचा विचार तुम्ही करू लागाल. समोर योगशास्त्र असूनही तुमचे मन त्या वस्तूमागे भरकटत जाईल. हाच विकल्प होय.

वर्गात अध्यापक शिकवत असतात त्याच वेळी नेमका एखादा कावळा ओरडतो. कावळ्याचा शब्द ऐकला की मन कावळ्यामागे जाते. कावळ्यावरच विचार चालू होतो व अध्यापकांच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष होते. हा विकल्प झाला. समोर कावळा नाही तरी त्याच्या शब्दाच्या ज्ञानामागोमाग मन धावत गेले. ही तिसरी वृत्ती झाली.

समोर वस्तू असेल तर मन त्यावर विचार करते. ही मनाची वृत्ती आहे. त्याच चार वृत्ती म्हणून सहाव्या सूत्रात सांगितलेल्या आहेत. पण मनाच्या धावण्याला समोर वस्तू पाहिजेच असे नाही. वस्तू नसेल तरी मन धावत सुटते, याला विकल्प म्हणतात. विशेष रीतीने कल्पना करणे म्हणजे विकल्प. विकृत कल्पना करणे म्हणजेही विकल्प होईल. आता आली का पंचाईत? शास्त्र आपल्याला गोंधळात टाकतं, ते असं. आता विकल्प म्हणजे नक्की काय समजायचे?

 ‘विकल्प’ या शब्दापासून ‘वैकल्पिक’ असा शब्द आपण वापरतो. वैकल्पिक या संकल्पनेनुसार, ‘आपल्याला दोन किंवा त्यापेक्षा अधिक म्हणजे दिलेल्या सर्व गोष्टींमधून  काही गोष्टी निवडायच्या असतात. उदा. महाविद्यालयात कंपलसरी विषयांबरोबरच तीन ऑपश्नल म्हणजेच वैकल्पिक विषय निवडायचे असतात. त्यात १० विषयातून ०३ विषय निवडता येतात. इथे निवड करताना इच्छा, उपयुक्तता, भावी संधी, निवड करण्याची व केल्यानंतर होणारे परिणाम स्वीकारण्याची जबाबदारी, आदी बाबी आपसूकच गृहीत असतात. आयुष्यात कोणताही आणि कधीही वैकल्पिक पर्याय निवडताना या सर्वच बाबी गृहीत असतात. आता इथेही विकल्प म्हणजे आपण ‘विशेष कल्पना करायची’ की ‘विकृत कल्पना करायची’ याची निवड वरील सर्व बाबी लक्षात घेऊन आपल्याला करता आली पाहिजे.

विकल्प याचा अर्थ, विरुद्ध विचार येणे असाही आहे. शब्दावरूनच तोही विचार येतो. अध्यात्माचा विचार चालू असताना अध्यात्म विरोधी विचार मनात येतात हे विकल्प होत. विकल्प ही मनाची वृत्ती आहे ती नष्ट होणे शक्य नाही, म्हणून ती काबूत आणली पाहिजे. त्यासाठी नामस्मरण सांगितले आहे. देवाचे नामस्मरण सतत केले तर विकल्प वृत्तीमुळे शब्दामागोमाग, देवाच्या नामामागोमाग आपले मन देवाकडे धावत जाईल व देव दिसेल. वाईट गोष्टीकडे मन जाण्यापेक्षा देवाकडे गेलेले फार चांगले. कारण त्यामुळे आपल्या हातून चांगली कर्मे होतात निदान वाईट कर्मे होत नाहीत. सत्य, शिव, ब्रह्म ही नामे मनात ठेवली तर मन विकल्पाने तिकडे धावेल व त्याच्याशी एकरूप होईल. म्हणजेच योग साधेल, जो विकल्प आपल्या मनास देवाकडे किंवा शिवाकडे किंवा ब्रह्माकडे घेऊन जाईल तो अक्लेश्कारक / अक्लिष्ट विकल्प आहे पण शेख महंमदी मात्र क्लेशकारक / क्लिष्ट विकल्प आहे. कारण शेख महंमद क्लेशकारक आहे तर ईश्वरचिंतन सुखकारक आहे.

या काळात ईश्वरचिंतन आणि नामस्मरण केले पाहिजे का? कशासाठी? कारण आम्ही तर बुद्धिवादी विज्ञान, तंत्रज्ञानाचे उपासक, सृष्टीचेही विजयकर्ते ! मानवी जीवनाची अस्मिता व्यक्त करणारा हा अभिमान कदाचित शोभणारा असेलही. मात्र त्याचे कळत-नकळत अहंकारात होणारे परिवर्तन हेच ठरते पतनाचे कारण, आणि या कलियुगात तर हे हमखासच घडते.    

कलियुग कसे असेल आणि या युगात कसे वागावे याबाबतची कथा आपल्याला काय सांगते, त्याचे निष्कर्ष आपल्याला काय सांगतात हे बघणे उद्बोधक होईल.कोकिळा, ससा, विहिरी, शिळा, रोपटे अशा विविध रूपकांच्या माध्यमातून ही कथा सांगते-   

‘कलियुगात धर्मगुरूंचा आवाज खूप मधूर असेल आणि खूप ज्ञानही असेल पण ते साधकांचे शोषण करतील,कलियुगात गरीब लोक श्रीमंतांसोबत राहतील पण ते आपल्या धनातील  एक कवडीसुद्धा गरीबांना देणार नाहीत,कलियुगात पालक मुलांवर एवढं प्रेम करतील की त्या प्रेमाने मुलं बिघडतील आणि त्यांचे आयुष्य उध्वस्त होईल,कलियुगात माणसे चारित्र्याच्या बाबतीत खूप घसरतील पण सर्वात शेवटी देवाचे नाम त्यांचे संरक्षण

करील, त्यांचा उद्धार होईल.’ हा उद्धार होण्यासाठी आपण किती आंतरिक सजगतेने वागतो हे मात्र महत्त्वाचे ठरणार आहे.

आपला आध्यात्मिक गुरू निवडताना डोळसपणे, विचारपूर्वक निवड केली तर शोषणाचा प्रश्न उद्भवणार नाही. उपकाराची भावना न बाळगता आपण आपल्यापरीने गरीबांना मदत केली तर विषमतेचे प्रश्न समाजाला छळणार नाहीत. आपण आपल्या मुलांवर, पालकांवर, नातेवाईकांवर इतर कोणावरही किंबहुना सर्वांवर प्रेम केलं पाहिजे, पण आपले प्रेम समोरच्याला त्रासदायक ठरणार नाही, याबाबत दक्ष राहिलं पाहिजे.अनुकूल – प्रतिकूल अशा कोणत्याही परिस्थितीत आपले चारित्र्य आपण प्राणपणाने जपले पाहिजे. आपला तिरंगाही हाच संदेश देतो, ‘सावधान चौबिसो घंटे, अरे चक्र के है कहते!’ ही देशभक्ती आणि देवभक्ती साधली तर जगाचे नंदनवन होण्यास वेळ लागणार नाही. त्यासाठी जगाला भक्कम आधार देणारे ईशचिंतन आणि नामस्मरण हाच सहज-सोपा मार्ग आहे.

वृंदा आशय

 

 

  

Sunday, 8 August 2021

प्रकाश ज्ञानाचा ; निरास अज्ञानाचा !

 

प्रकाश ज्ञानाचा ; निरास अज्ञानाचा!

नमस्कार !  मागच्या वेळेला ‘ज्ञानदीप तेवत राहो’ मध्ये ‘लोकांनी श्लोकाची भूमिका स्वीकारावी’, अशी अपेक्षा व्यक्त झाली. त्या अपेक्षेला आपण भरभरून प्रतिसाद दिलात. तेव्हा हा मांगल्याचा, ज्ञानाचा प्रकाश पसरवत अज्ञानाचा निरास करूयात. वळूयात महर्षी पतंजलींच्या आठव्या सूत्राकडे –

विपर्ययो मिथ्याज्ञानमतद्रूपप्रतिष्ठम् || ८ ||

(पातंजल योगदर्शन, समाधिपाद, सूत्र क्र.८)

 

‘भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातंजल योगदर्शन’ या ग्रंथामध्ये योगाचार्य कृष्णाजी केशव कोल्हटकर या आठव्या सूत्राचा अर्थ सांगताना विशद करतात, “एका वस्तूचे जे वास्तविक स्वरूप आहे, त्यावर त्या वस्तूचे ज्ञान होत नसून अतद्रूप म्हणजे दुसऱ्याच वस्तुस्वरूपावर जेव्हा ती पहिली वस्तू भासते तेव्हा होत असलेले जे मिथ्या ज्ञान तो विपर्यय होय.” (उदा. समोर पडलेली दोरी साप भासणे)

याचा सूत्रार्थ सांगताना स्वामी विवेकानंद ‘राजयोग’ मध्ये स्पष्टीकरण देतात, “एका गोष्टीला चुकीने वा भ्रांतीने दुसरीच समजणे हा आपल्या चित्तात उठणार्‍या वृत्तींचा दुसरा वर्ग आहे. उदाहरणार्थ शिंपल्याला चांदीचा तुकडा समजणे.”

तर सूत्रार्थ सांगताना ओशो ‘ओशो पातंजल योग – भाग १’ यामध्ये लिहितात,असम्यक, मिथ्या ज्ञान म्हणजे वस्तूच्या यथार्थ स्वरूपाशी न जुळणारी फसवी धारणा.”

या सूत्राचे विवेचन करताना ‘पातंजल योग – विज्ञाननिष्ठ निरुपण’ या ग्रंथात डॉ. प. वि. वर्तक लिहितात,  “त्याच्या  रूपात स्थित नसलेले मिथ्या ज्ञान म्हणजे विपर्यय.”
हे सगळे सूत्रार्थ वाचले की लक्षात येते, ‘विपर्यय’ शब्द थोडासा अवघड वाटला तरी ‘मिथ्या ज्ञान’ हा शब्द आपल्या परिचयाचा आहे. ‘ब्रह्म सत्य जगन् मिथ्या’ हे आम्ही कधीनाकधी, कुठेनाकुठे वाचलेले असते, कानावर पडलेले असते. हे आठवल्याबरोबर आम्ही लगेच निष्कर्षावर येतो, ‘हं, माहिती आहे हे. पण ते काही आपल्या कामाचे नाही. तत्त्वज्ञानाची बोजड ओझी उचलणा-यांनी त्याच्याकडे बघावे. काय ते एक ब्रह्मच सत्य आहे, आणि जग मात्र खोटे, असं काहीतरी सांगते ते. आपल्याला आपले समोर दिसते ते खरं मानावं आणि गप्प बसावं झालं.” अशी साधारण आपली प्रतिक्रिया असते. 

आणि आपल्याही नकळत आपण विपर्यय, विपर्यास करण्यास सुरुवात केलेली असते. कारण आमचा पूर्वग्रह तिथे आपसूक कार्यरत होतो. मिथ्या शब्दाचा अर्थ फक्त ‘खोटे’ एवढाच होतो, आणि तोच अर्थ आहे, हे आम्ही १०० % खरं मानलेले असते. खरे मानलेले असते ते ऐकीव किंवा वरवरच्या माहितीवर. तपासून पाहण्याचे, शब्दाच्या मुळाशी जाण्याचे कष्ट कोणी घ्यायचे? ते अभ्यासकांनी घ्यावेत अशी आमची स्पष्ट धारणा असते. अभ्यासक कष्ट घेतातही. मात्र आपण त्यांच्यापर्यंत तरी पोहोचणे गरजेचे आहेच ना!  

डॉ. प. वि. वर्तक सांगतात मिथ म्हणजे ‘खोटा’ हा व्यवहारातला अर्थ. मिथ याचा खरा अर्थ ‘जुळून तयार झालेले’ असा आहे. कारण त्यात ‘मिथ म्हणजे जुळणे’ हा धातू आहे. दोन गोष्टी जुळून जे तयार होते ते मिथ असते. ते जुळून तयार झालेले असल्याने भास असतो, सत्य नसते. म्हणून मिथ म्हणजे खोटे हा अर्थ नंतर प्राप्त झाला आहे. येथे विपर्यय मिथ्या म्हणजे जुळून तयार कसा होतो, ते पाहू. विपर्यय हा अतद्रूपप्रतिष्ठम् आहे. ‘त्याच्या रूपात स्थित न झालेले’, असा त्याचा सरळ अर्थ आहे. त्याच्या म्हणजे कोणाच्या रूपात ? समोर जे प्रमाण असेल त्याच्या रूपात.

आधीच्या सातव्या सूत्रात मनाच्या नेहमीच्या वृत्ती सांगितलेल्या आहेत. समोरच्या प्रत्यक्ष वस्तूशी समरूप होणे ही पहिली वृत्ती होय. त्या वस्तू वरून अनुमान काढणे ही दुसरी वृत्ती होय. त्या वस्तूसंबंधी आगम ज्ञानाची उजळणी करणे ही तिसरी वृत्ती आहे. पण या तिन्ही वृत्ती सोडून मन चौथ्या वृत्ती मागे जाते. ही चौथी वृत्ती म्हणजे समोरच्या गोष्टीचा विपर्यास करणे. प्रत्यक्ष, अनुमान व आगम या तीनही वृत्ती एकत्रितपणे ‘प्रमाण’ या नावानं संबोधल्या असल्याने, विपर्यास ही दुसरी वृत्ती ठरते.

आता विपर्यय किंवा मिथ्या ज्ञान या गोष्टी आपल्याला कळाल्या. मात्र हे  तद्रूपप्रतिष्ठम् आणि अतद्रूपप्रतिष्ठम् ही काय भानगड आहे? हे लक्षात येण्यासाठी, योगाचार्य कोल्हटकर आपल्या मदतीला येतात. साप आणि दोरीचे उदाहरण ते  विस्ताराने समजावून सांगतात. आता ‘हा साप आहे’, हे ज्ञान ‘तद्रूपप्रतिष्ठ’ किंवा ‘अतद्रूपप्रतिष्ठ’ आहे, म्हणजे काय?

 हा साप आहे, हे ज्ञान जर खराखुरा साप पाहून झाले तर ते सापाच्या खऱ्या स्वरूपावर आधारलेले म्हणजे तद्रूपप्रतिष्ठ’ (त्याच्या मूळ रूपावर स्थित होणारे) होय. पण जर ते ज्ञान सापावर न होता साप नसलेली जी दोरी तिच्यावर भासमान होईल तर ते ‘अतद्रूपप्रतिष्ठ’ झाले. तात्पर्य एका वस्तूचा भास जेव्हा दुसऱ्या वस्तूवर होतो आणि दुसऱ्या वस्तूचे स्वरूप यथार्थपणे जाणल्यावर जो भास मिथ्या ठरतो त्याला विपर्यय म्हणावयाचे. दोरीच्या स्वरूपाचे ज्ञान झाल्यावर हा साप आहे ह्या ज्ञानाचा निरास होतो किंवा त्या संदर्भात ते चुकीचे ज्ञान आहे, अज्ञान आहे हे कळते आणि त्याचा निरास होतो. सापाचा भास होऊन चालणारी धावाधाव थांबते.  

एखाद्या वस्तूविषयी येणारा संशय हा अतद्रूपप्रतिष्ठ असल्याने आणि त्याची निवृत्ती होत असल्याने तोही विपर्यय होय.  या मिथ्याज्ञानविपर्यायला अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश या पाच अवस्था आहेत. कळकळीने सांगितलं जातं तेव्हा विपर्यास घडत नाही. ‘कळकळ’ म्हणजे ज्याला कळतं, कळणं खोलवर जातं आणि हे दुसऱ्याला कळलं पाहिजे, याची ओढ लागते त्यातून ‘कळकळ’ जन्माला येते. कळकळीनं सांगावं, पोहोचवावं. जे खरं आहे तेच पोहोचू शकतो, हे वास्तव आहे, सत्य आहे.

    दोन किंवा अधिक गोष्टी एकत्र येऊन जे दिसते ते मिथ होय. समोरच्या वस्तूशी एकरूप होणे, तद्रूप होणे ही नेहमीची क्रिया आहे. तशी तद्रूपता आली नाही तर विपर्यय होतो. समोरच्या वस्तूशी जर आपले मन तद्रूप झाले नाही तर त्या वस्तूचे खरे ज्ञान होत नाही. अशा वेळी मिथ्या ज्ञान निर्माण होते. मिथ्या ज्ञान कसे निर्माण होते? म्हणजे जुळण्याची क्रिया इथे आहे, समोर वस्तू आहे, आपलं मन आहे, तरी तद्रूप करता आलेले नाही. अशावेळी पूर्वग्रहामुळे आपल्या मनातील कल्पना त्या वस्तूच्या ग्रहण क्रियेमध्ये मिसळतात. या मिसळीमुळे मिथ्या ज्ञान तयार होते. उदाहरणार्थ दोरी समोर असताना तो  साप दिसणे.

विपर्यय होण्याचे कारण, काहीतरी पूर्वग्रह असतो. या पूर्वग्रहामुळे एक विशिष्ट समजूत आपण करून घेतो. व त्या दृष्टिकोनातून आपण बघतो. यामुळे सत्य बाजूला सारले जाऊन, विपर्यास पदरी येतो. विपर्ययात आपल्या डोळ्यांसमोर जे असते, त्याचे सत्यरूप आपणाला कळत नाही. जे खरे रूप आहे, त्याचे ज्ञान बाजूला सारले जाऊन मिथ ज्ञान पुढे आणले जाते. हीच मनाची विपर्यय करण्याची वृत्ती आहे.

व्यवहारात मनुष्य नेहमीच प्रत्येक गोष्टीचा विपर्यास करीत असतो. अहो, माणसाचे काय विचारता, ‘वाजे पाऊल आपुले; वाटे मागुनी कोण आले’ अशी त्याची संभ्रमित अवस्था. जे खरं आहे ते तसं न बघता आपल्या कल्पनांची पुटं चढवून, तो बघतो. साहजिकच सत्य ज्ञान होत नाही. सत्य म्हणजेच ब्रह्म किंवा आत्मा असल्यामुळे आपण ब्रह्म किंवा आत्मा यांचे ज्ञान करून घेऊ शकत नाही. विपर्यायाची वृत्ती नाहीशी केली, तरच आत्मज्ञान होऊ शकते. देवकीचा आठवा पुत्र श्रीकृष्ण जन्मावा आणि साऱ्या अपप्रवृत्ती नष्ट व्हाव्यात, अज्ञानाचा निरास व्हावा, तसे हे आठवे सूत्र मला विपर्यास नाहीसे करून सत्याच्या दिशेने नेणारे वाटते. आजच्या दीप अमावास्येला विपर्यासाचा अंधार संपून सत्याचा प्रकाश पसरावा एवढीच प्रार्थना !

वृंदा आशय

Sunday, 1 August 2021

ज्ञानदीप तेवत राहो

 

ज्ञानदीप तेवत राहो

 

वडीलधा-यांनी आशीर्वाद दिले, सहका-यांचे प्रोत्साहन मिळाले, योग तज्ज्ञांनी कौतुकाची थाप दिली, मग मनोवृत्ती प्रफुल्लित होणार नाहीत का? मन आनंदी झालं की मनाची कवाडं उघडतात. बंद दरवाजे उघडले की मोकळं वारं खेळायला लागतं, स्वच्छ प्रकाश पसरायला लागतो. स्वच्छ प्रकाशात स्पष्ट दिसायला लागतं. खूप काही कळायला, समजायला लागतं. माणूस ज्ञानाच्या दिशेने वाटचाल करायला लागतो. तेव्हा या प्रफुल्लित मनोवृत्तीने वळूयात महर्षी पतंजलींच्या सातव्या सूत्राकडे जे ज्ञानप्राप्तीची प्रमाणे विषद करते-

प्रत्यक्षानुमानागमा: प्रमाणानि || (पातंजल योगदर्शन, समाधिपाद, सूत्र क्र. ७)

(सूत्रार्थ - प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम ही तीन प्रमाणे होत.)

सहाव्या सूत्रामध्ये महर्षींनी प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा, स्मृती या पाच प्रमुख मनोवृत्ती असल्याचे निर्देशित केले आहे. सातव्या सूत्रामध्ये ‘प्रमाण’ या पहिल्या वृत्तीबद्दल ते स्पष्टीकरण देतात. या वृत्तीचे तीन प्रकार. प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम. ‘राजयोग’ या ग्रंथामध्ये याचा सूत्रार्थ सांगताना स्वामी विवेकानंद नोंदवतात – प्रत्यक्षानुभव, अनुमान व आप्तवचन (अधिकारी व्यक्तींचे शब्द) ही प्रमाणे होत.

         स्वामीजी सांगतात प्रत्यक्ष प्रमाण किंवा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे जे काही आपण पाहतो किंवा अनुभवतो ते. इंद्रियांना भ्रमात पाडणारी कोणतीही गोष्ट न घडल्यास मला जे दिसेल वा अनुभवास येईल ते प्रमाण मानलं पाहिजे. मी हे जग पाहतो, अनुभवतो हाच जगाच्या अस्तित्वाचा पुरेसा पुरावा आहे. याला म्हणतात प्रत्यक्ष प्रमाण. प्रति + अक्ष = प्रत्यक्ष. आपल्या डोळ्यांसमोर जे घडतं ते प्रत्यक्ष. डोळ्यांबरोबरच कान, नाक, जीभ व त्वचा ही सर्व ज्ञानेन्द्रिये प्रत्यक्ष प्रमाण देतात. ऐकल्याबरोबर मन ध्वनीच्या उगमापाशी सरूपता साधतं, गंध आल्याबरोबर त्याच्या उगमाशी, चव लागल्याबरोबर त्याच्या मूळ कारणाशी तर स्पर्शाबरोबर मोहरलेले मन त्या अनुभवाशी सरूप होतं. हे असं मूळापाशी जाणं घडत असतं म्हणून ती प्रमाण वृत्ती. पाचही ज्ञानेंद्रियांकडून येणार ज्ञान हे प्रत्यक्ष प्रमाण या सदरात मोडतं, असं योगशास्त्राचे अभ्यासक डॉ. प.वि.वर्तक यांनी आपल्या, ‘पातंजल योगदर्शन : विज्ञाननिष्ठ निरूपण’ या ग्रंथामध्ये नोंदवलेलं आहे.

         अचूक स्वरुपात ज्ञानग्रहण करण्यासाठी आपण आपल्या पंचज्ञानेंद्रियांच्या क्षमता वाढवल्या पाहिजेत. लहान मुलांची ही क्षमता अगदी तीव्र आणि तीक्ष्ण असते. त्यामुळे अनुभव त्यांच्या थेट आत उतरतो. अनुभवाचा अर्थ लावणारे मन, बुद्धी सक्षम पाहिजेत. माणसाने हलक्या कानाचे, दुर्बल मनाचे नसावे. त्यातच आजच्या काळात पाहणे म्हणजे फक्त समोर घडणारेच नाही. यंत्रांच्या माध्यमातून पाहणे अधिक घडते. दुर्बीण दूरपर्यंतचे दाखवू शकते तर टीव्ही, मोबाईल सगळं जग समोर आणून ठेवतात. संगणक, मोबाईल हाताळताना आमची तारांबळ उडते. सगळे पर्याय  तिथेच असतात पण पाहता येत नाहीत. करून पाहण्याची तयारी नाही. आपण होऊन माहिती, ज्ञान घेण्याची उत्सुकता नसते. संयम आणि चिकाटी नसते. ते वाढवले पाहिजेत.

    मात्र दरवेळी प्रत्यक्ष प्रमाणाचा आग्रह धरता येत नाही. प्रत्यक्ष प्रमाणाला काही मर्यादा पडतात. ज्ञान तर त्याच्या व्यापक आणि मूळ स्वरुपात होणे आवश्यक आहे. त्यामुळे आणखी काही प्रमाणे ठरवलेली आहेत. अनुमान हे दुसरे प्रमाण होय. मनाचे या अर्थी मान हा शब्द तयार होतो. मनाचे ज्ञान म्हणजे मान होय. उदाहरणार्थ मी असे मानतो. शेवटी आपल्या मानण्या, न मानण्यावर, सामूहिक मान्यता देण्यावर आपण ‘प्रमाण’ काय ते ठरवत असतो. मनाच्या मागोमाग येते ते ‘अनुमान’ होय. तर्क होय. एखाद्या चिन्हावरून त्यानं सुचवलेल्या वस्तूचं ज्ञान होतं. उदा. धूर पाहून तिथे अग्नी आहे असे ज्ञान झालं, याला म्हणतात अनुमान प्रमाण. रेडिओवर गायक गातो. आपण आवाजावरून ओळखतो, कोण गात आहे ते. फुलं समोर  दिसत नसले तरी दुरूनच सुगंध येतो. फुलं दिसत नाहीत पण आपण अचूक ओळखतो कोणती फुलं आहेत मोगरा, गुलाब, निशिगंध की रातराणी, सहज सांगतो. मागच्या अनुभवावरून ते ओळखतो. अनुमाना मुळे स्थलकालाची मर्यादा ओलांडली जाते. पूर्वी काय घडले होते आणि पुढे काय घडणार याचा अंदाज बांधता येतो. आपल्या ज्ञानाच्या पातळीप्रमाणे हे अनुमान बरोबर किंवा चूक  ठरते.

         
आगम हे तिसरे प्रमाण आहे. स्वामी विवेकानंदांच्या मते आगम प्रमाण म्हणजे आप्तवाक्य. आप्तवाक्य म्हणजे ज्यांना सत्याचा मूर्त साक्षात्कार झालेला आहे अशा योग्यांची प्रत्यक्ष अनुभूती. जो विशुद्ध सत्वाचा योगी असतो, जो पवित्र, निर्मोही, नि:स्वार्थी, नि:संग आणि अतिंद्रीय ज्ञानी असतो त्याला भूत, भविष्य, वर्तमान हे सर्व उघड्या पुस्तकासारखे वाचता येतं. त्याचे शब्द प्रमाण असतात. कारण ज्ञानाचा त्याला स्वतःच्या अंतर्यामी साक्षात्कार झालेला असतो. तो सर्वज्ञ असतो. असेच पुरुष शास्त्रांचे प्रणेते असतात आणि म्हणूनच शास्त्र ही प्रमाण होत.

         डॉ. प. वि. वर्तक ‘आगम’ प्रमाणाचा वेगळा अर्थ लावतात. त्यांच्या मते काही वेळा अनुमान करणे जमत नाही कारण आपले ज्ञान त्या तोडीचे नसते. मग ‘आगम’ हेच प्रमाण असते. आगम म्हणजे आपल्यापर्यंत आलेले ज्ञान. हे ज्ञान आपल्या पूर्वजांकडून आपल्यापर्यंत येते किंवा वर्तमानकालीन ज्ञानी माणसांकडून आपल्यापर्यंत येते. माणसाच्या मर्यादित आयुष्यात सर्व ज्ञान प्रत्यक्ष प्रमाणाने मिळवणे केवळ अशक्य असते. ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ ही म्हण आगम प्रमाण व्यक्त करते. इतरांच्या अनुभवाचा फायदा घेऊन आपण ज्ञान कमावणे म्हणजे आगम. हे इतर म्हणजे जगातील यच्चयावत लोक. कुटुंबापासून विश्वकुटुंबापर्यंतचे सारेच यात सामावले जातात.

    आगमाची अशी व्यापकता वाढली की ज्ञानाचे पावित्र्य जाणीवपूर्वक  टिकवावे लागते. ज्ञान हे सत्यज्ञान असले पाहिजे. ते पूर्वज्ञानाला विरोधी नसावे. शास्त्राच्या कसोटीवर कोणालाही पारखून घेता यावे. ज्ञान आणि ज्ञानोपासकाचे चारित्र्य या दोघांचेही तेज परस्परावलंबी असते. लोक आणि श्लोक हे दोन शब्द एकमेकांच्या फार जवळ जातात. लोकांनी श्लोकाची भूमिका स्वीकारली पाहिजे. माहितीचा पसारा न देता ज्ञानाचे मांगल्य पुढे नेता आलं पाहिजे.

    आज मला मोठा आनंद आहे. या सूत्राचे विवेचन करत असताना वर निर्देशित केलेल्या सर्व गुणांनी युक्त अशा दोन महापुरुषांचे संदर्भ आजच्या दिवसाला आहेत. या ज्ञानी, कर्तृत्ववान आणि कल्याणकारी अशा  महापुरुषांची एकाची जयंती तर एकाची पुण्यतिथी आहे.

    .....पण खेद याचाच आहे, सामान्य माणसापर्यंत पोहचलेलं ज्ञान त्याला सांगतंय, कोणत्याही एकाच महापुरुषाचा पुरस्कार कर. पर्यायाने वास्तव इतिहासाचा तिरस्कार कर. आपल्या भूमिकेने वर्तमानात हाहाकार निर्माण करणा-या माणसाने, समाजाने आत्मपरीक्षण करून आपले काय चुकतंय याचे ज्ञान करून घेणे, ही काळाची गरज आहे.

वृंदा आशय   

पुनश्च हरि ॐ !

  (दि.२१ जून २०२२ रोजी योगाभ्यास करताना सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यांसमवेत संपूर्ण प्राध्यापक वर्ग    ) .   पुनश...